मुंबई : (Suvarna Karanje)“आमदार म्हणून सुनील राऊत यांनी कामे केली नाहीत, हा मुद्दा घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. ज्यावेळी या मतदारसंघाचे मतदार बदल घडवतील आणि आमदार म्हणून मला विधानसभेत पाठवतील, त्याच वेळेला भोंगा, दादागिरी संपणार आहे,” असा घणाघात विक्रोळी विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या उमेदवार सुवर्णा करंजे यांनी केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दै. ‘मुंबई तरुण भारत’ने त्यांच्याशी साधलेला संवाद...
प्रचाराला काही दिवस राहिले आहेत. त्यामुळे तुम्ही कोणते मुद्दे घेऊन प्रचार करणार आहात?
- मी मागच्या सात वर्षांत केलेली विकासकामे आणि आमदार म्हणून सुनील राऊत यांनी कामे केलेली नाहीत, हा मुद्दा घेऊन आम्ही विधानसभेला समोरे जात आहोत. लोकांचा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तसेच, बर्याच लोकांना त्रास दिला असून बदल घडविणार असल्याचे लोक सांगत आहेत. विशेषतः ‘लाडकी बहीण योजने’ला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
विक्रोळी मतदारसंघाचा मोठा विकास केल्याचा दावा सुनील राऊत करतात, तुमच्या मते विक्रोळीचा विकास किती केला?
- त्यांनी एक तरी चांगले विधायक काम दाखवल्यास मी स्वतः निवडणुकीच्या मैदानातून बाहेर पडेन. मी सीबीएसई शाळा सुरू केली. सिमेंट काँक्रीटचे ३५ रस्ते केले. महामार्गाला जोडणारे रस्ते केले. भूमिगत कचराकुंडी केली. १२७ कोटींचे रुग्णालय बांधण्यात येत असून त्याचे भूमिपूजन झाले आहे. ४०० गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांनी एक तरी काम केले का? लादी-गटारे ही आमदाराची कामे आहेत का? सीआरझेड, ‘म्हाडा’चा प्रश्न सोडवला नाही. मागासवर्गीयांचा प्रश्न आहे. समाज कल्याण केंद्राची वास्तू जीर्ण झाली आहे. या समस्या सुटलेल्या नाहीत.
विक्रोळीसाठी आपले व्हिजन काय असणार आहे?
- मागील दहा वर्षांत जी कामे झाली नाहीत, त्या कामांना प्राधान्य देणार आहे. कांजुर, भांडूपमध्ये मिठागरांच्या जागेचा प्रश्न आहे. डम्पिंग ग्राऊंड हटविण्यासाठी प्रयत्न करणार, तसेच दुर्गंधी कमी करण्याचा प्रयत्न करणार. आमदारांनी विधानभवनात हे प्रश्न मांडले नाहीत. त्यामुळे विकास रखडला. मी प्रभाग ११७ मध्ये केलेल्या कामांचे नागरिक साक्षीदार आहेत. तसेच, मी कामे करणार आहे. ती वचननाम्यात मांडत आहे.
सुनील राऊत यांनी ‘बकरी हलाल होगी’ अशी टिप्पणी केली. याला शिवसेनेकडून अपेक्षित विरोध झाला नाही. याचे कारण काय?
- महिलावर्ग त्यांच्या स्वभावामुळे नाराज आहे. ज्येष्ठांचाही एकेरी उल्लेख केला जातो. अशी भाषा लोकप्रतिनिधीला शोभत नाही.
वाढत्या महागाईच्या प्रश्नाकडे आपण कसे पाहाता?
- महागाई वाढली असे म्हणत असलो, तरी लोकांचे आर्थिक उत्पन्न वाढले आहे. एकेकाळी ३०० रुपये पगार घेणारे आता जवळपास ६० हजार पगार घेत आहेत. त्यामुळे ‘लाडकी बहीण योजने’त १ हजार, ५०० रुपयांवरून २ हजार, १०० रुपये दिले जाणार आहेत. नागरिकांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विश्वास आहे. ते योग्य निर्णय घेतील आणि निवडणुकीनंतर पैसे खात्यात जमा होतील.
सकाळचा भोंगा बंद झालेला दिसेल का?
- या विभागातील मतदार मला विधानसभेत पाठवतील, त्याच दिवशी सकाळचा भोंगा बंद, दादागिरी संपणार आहे.
सुनील राऊत यांनी त्रास दिल्याने तुम्ही उबाठा गट सोडला. काय सांगाल त्याबाबत?
- मला कोणत्याही कार्यक्रमाला बोलावले जात नव्हते. २०१७ सालच्या निवडणुकीत विरोध असणार्यांना पक्षात घेताना मला डावलले. माझ्या कामांत खो घातला. नगरसेवक हा विरोधी पक्षाचा असल्यासारखे माझ्याशी वागणे होते. रस्त्याच्या कामाबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता, आमदारांनी कोणतीही मदत केली नाही. उलट त्यांनीच ते करायला लावले. विरोध करण्याचे अनेकदा काम केले. मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. रिक्षा युनियनबाबत अगोदरचे नेते काहीही करत नसल्याने ते माझ्याकडे आले. त्यांनी अध्यक्ष होण्याचे सांगितले. त्यामुळे रिक्षा युनियनचे अध्यक्ष झाले. मात्र, आमदारांनी ते मानले नाही. २०२२ नंतर महापालिकेची कामे केल्यानंतरही मला डावलले. अनेकदा बोलू दिले नाही.
लोकसभेला विक्रोळीतून पिछाडी मिळाली. विधानसभेला ती कशी भरून काढणार?
- निश्चितच प्रयत्न करू. लोकसभेला सुनील राऊत यांच्या मतदारसंघात त्यांचे मताधिक्य कमी झाले. विधानसभेला त्यांचे डिपॉझिट वाचेल का, हा प्रश्न आहे. कारण, मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकांना त्यांनी त्रास दिला आहे. ते माझ्याशी जोडले आहेत.
मतदारांना काय आवाहन करणार?
- विकास करणार्याच्या पाठीशी मतदारांनी उभे राहावे. आज विक्रोळी भकास केली. कांजुरमध्ये माझा प्रभाग मी नीट ठेवला आहे. त्यात एकही यांचे काम नाही. विक्रोळीत कन्नमवारनगर, टागोरनगर, सूर्यनगर, पवई येथे एकही काम केले नाही. त्यामुळे विजयी झाल्यानंतर विकास करून दाखवणार. कारण, मला काम करण्याची पद्धत माहीत आहे. विक्रोळीच्या समस्या विधानसभेत मांडेन.