एखादी कला विकसित करायची असेल, तर त्यासाठी इच्छाशक्ती महत्त्वाची. त्याच बळावर मोत्यांच्या विश्वात रमणार्या वसई येथील माधवी देशपांडे यांच्या कार्याविषयी...
माधवी देशपांडे यांचा जन्म विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील. मात्र, त्यांचे सगळे बालपण, शैक्षणिक कारकीर्द आणि जीवनप्रवास हा अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील. कलेचे उपजतच ज्ञान असलेल्या माधवी देशपांडे यांचा प्रवास तसा सर्वसामान्य गृहिणीसारखा असला, तरी त्यांच्या कलागुणांची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते.
वसईत स्थायिक झालेल्या माधवी यांनी महाविद्यालयीन जीवनानंतर वेगवेगळ्या कलाक्षेत्रांत आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली. भविष्यात नेमके काय करायचे, या प्रश्नाचे उत्तर घरच्या परिस्थितीशी चार हात करताना मिळाले नसले, तरी या रहाटगाड्यात आपणदेखील इतरांप्रमाणे आपल्या कलागुणांचा विकास करू शकतो, हा आत्मविश्वास निर्माण झाला आणि मग निर्मिती झाली ‘आकृती’ची!
प्रारंभीच्या काळात आपल्या दोन मुलांचा सांभाळ करताना तारेवरची कसरत करीत माधवी देशपांडे यांनी आपले पती देविदास देशपांडे यांना साथ देत, आधी शाळेत आणि नंतर बँकेत नोकरी करून हातभार लावला खरा; मात्र आपल्यातील कलेचे उपजणे त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. घरातील परिस्थिती थोडी सुधारली असतानाच, गंभीर आजारपणाचा सामना करीत माधवी देशपांडे यांनी या वेदनांवर मात करण्यासाठी औषधांपेक्षा आपल्यातील सुप्त गुणांना विकसित करण्यास प्राधान्य दिले. “बहीण भावना उपासने आणि आई अनुराधा यांच्या प्रोत्साहनातून आपल्याला हा छंद जोपासण्याचा मार्ग गवसला. त्यांनी दिलेल्या पाठबळामुळे ही वाटचाल शक्य झाली,” असेही त्यांना आवर्जून सांगावे वाटते. यामुळे ‘आकृती’तून आता माधवी देशपांडे ज्या काही मोत्यांच्या दागिन्यांच्या कलाकृती साकारीत आहेत, त्यांना जगभरातून मागणी आहे. त्यांचे मोत्यांचे दागिने अतिशय सुरेख, सुबक आणि आकर्षक असल्याने त्यांना ठिकठिकाणाहून मिळणारा प्रतिसाद त्यांच्या कामाची पावती देतोच; मात्र यातून त्यांच्या कौशल्यविकासालादेखील अधिक चालना मिळत असते.
अनेक ठिकाणी त्यांच्या या मोत्यांच्या दागिन्यांचे प्रदर्शनदेखील होत असते. त्यात महिलांकडून त्या अनेक संकल्पना समजून घेतात आणि आपल्या कलाकृतीतून नेहमीच नाविन्याचा खजिना सादर करीत असतात. मोत्यांचे दागिने म्हणजे पाऊले, महिरप, रांगोळ्या असा सर्वसाधारण समज माधवी देशपांडे यांनी आपल्या कलाकौशल्याने खोडून काढला आहे. मोत्यांपासून त्यांनी ज्या वस्तू तयार केल्या आहेत, त्यांची यादी तर भली मोठी. बदलत्या कालानुरूप सण, घरातील आनंदाचे प्रसंग आजकाल विविध तर्हेने साजरे होत असतात. नेमके हेच हेरून माधवी यांनी मंगळागौर, श्री महालक्ष्मीपूजन, गौरी-गणपती, नवरात्रोत्सव, संक्रात, चैत्र पाडवा विवाह समारंभातील विविध विधी, उपनयन संस्कार तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमांसाठी विविध प्रकारचे मोत्यांचे बनविलेले ‘हटके’ सेट म्हणजे त्यांच्या ‘आकृती’चा यशाचा तुरा आहे. वसईत त्यांनी आपल्या घरीच ही मोत्यांच्या दागिन्यांची निर्मिती करून सभोवतालच्या महिलांना आणि समाजमाध्यमांतून इतरांना याबाबतची माहिती दिली आहे.
माधवी देशपांडे यांनी बनविलेल्या कलाकृतींमध्ये मोत्यांचा श्रीकृष्णाचा पाळणा, श्री विठ्ठल-रुक्मिणी, महादेवाची पिंड, विविध प्रकारची मोत्यांची तोरणे, समई, पणती, दिवे, पाऊले, विविध प्रकारची फुले, कलशाचे आवरण, स्वस्तिक, पादुका, तुळशी वृंदावन, टाळ, श्री गजानन महाराजांची पालखी, भातुकलीचा खेळ, बाहुल्यांचे विविध प्रकार, उपनयन संस्कारासाठी असलेल्या विधीतील भिक्षावळ, शैलविधी, नवरात्रोत्सवानिमित्त बनविलेल्या मोत्यांच्या देवीची विविध रूपे मोत्यांची देवीची ओटी, की-चेन, अंगठी, श्रीगणेशासाठी खास मोत्यांचे दुर्वा, मोदक, सुपारी, जास्वंद, मोत्यांचे वस्त्र, भारताचा तिरंगा ध्वज, भिंतीवरील फ्रेम, टीपॉयवरील साहित्य, तसेच अन्य वस्तू त्या अतिशय सुरेख बनवितात. त्यामुळे त्यांना मागणीदेखील अधिक आहे. प्रदर्शनीत वस्तू आवडल्याचे अभिप्राय त्यांना अधिक प्रेरणा देतात, असे त्या सांगतात.
आपण या क्षेत्रात कसे आलो, याचे नेमके कारण सांगता येत नसले, तरी आपल्यातील कलेला पती आणि मुलांनी दिलेले प्रोत्साहन तसेच सभोवतालच्या सामाजिक वातावरणातून मिळालेली ऊर्जा यांमुळे हे शक्य झाल्याची भावना माधवी व्यक्त करतात. सामाजिक कार्यात त्यांनी नवरात्रोत्सव, गणेशोत्सव तसेच अन्य मोहिमांमध्ये सहभाग घेतला. स्वच्छतेला प्राधान्य देणे त्यांना आवडते. पर्यटन आणि मैत्रिणी जमविणे हा त्यांचा छंद. आपली ही कला अधिक विकसित व्हावी, यादृष्टीने त्यांनी ‘आकृती’च्या माध्यमातून आता समाजमाध्यमांद्वारे आणि मुंबई, पुणे आणि अन्य शहरांतील विविध प्रदर्शनांतून प्रसार करायला सुरुवात केली आहे. घरातील कामांचा व्याप सांभाळून ही कला विकसित करण्यावर आपला नेहमीच भर असेल आणि या माध्यमातून नव्या कलाकारांनादेखील प्रोत्साहन मिळेल, या भावनेतूनच हे कार्य करीत असल्याचे माधवी यांनी नमूद केले.
हा छंद म्हणजे आपला श्वास असून ‘सांसो की माला पे..’ उक्तीनुसार भविष्यातदेखील आपण हा आकृतीचा आकार अधिक सुबक आणि सुंदर करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट करताना “हे करताना ज्या तर्हेने आपण सणवार, उत्सव आणि मंगलप्रसंग घरोघरी साजरे करतो, त्यात अशा वस्तूंमुळे चैतन्य निर्माण होत असते. सर्वांचा उत्साह वाढत असतो. हे मोत्यांचे सौंदर्य आपल्या मंगलकार्यात अधिकच भर घालीत असते. म्हणूनच यासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार आहे,” असे माधवी देशपांडे सांगतात. त्यांच्या या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा.
(अधिक माहितीसाठी संपर्क ः 9822707939)