कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला लागलेले विकासाचे ग्रहण दूर करण्यासाठी इकडे भाजपचा महापौर असणे आवश्यक आहे असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कल्याणात व्यक्त केले.
कल्याणातील दिग्गज सामाजिक कार्यकर्ते जतिन प्रजापती यांच्यासह अनेक इतर पक्षाच्या भाजप पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. कल्याण पश्चिमेतील महाजनवाडी सभागृहात हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. यामुळे भाजपाची ताकद वाढल्याचे बोलले जात आहे. सामाजिक कार्यकर्ते जतिन प्रजापती यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, जिल्हाध्यक्ष नंदू परब आदी भाजपच्या वरिष्ठ नेते उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात विकासाचा झंजावात सुरू असून अनेक पक्षांतील पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. तर कल्याणचा हा संपूर्ण परिसर आपल्याला भाजपमय करायचा असून त्यासाठी आपण सर्वांनी संघटनात्मकदृष्ट्या एकत्रित काम करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
अन् प्रवेश प्रक्रियेला वेग आला
कल्याणच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात जतिन प्रजापती हे एक मोठे नाव असून गेल्या दोन दशकांपासून त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच प्रजापती यांनी 2010 आणि 2015 मध्ये स्वबळावर अपक्ष म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. मात्र अवघ्या काही मतांच्या फरकाने त्यांना निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले होते.
परंतू त्यानंतरही खचून न जाता त्यांनी अस्तित्व प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपले सामाजिक कार्य सुरूच ठेवले. परिणामी त्यांचे हे सामाजिक काम, पाठीशी असलेली तरुणांची मोठी फौज आणि शहरात असलेला प्रचंड जनसंपर्क पाहता भाजपकडून त्यांना पक्षात घेण्यासाठी हालचाली सुरू होत्या. त्यात भाजप प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती झाल्यानंतर या प्रक्रियेला वेग आला आणि अखेर रविवारी जतिन प्रजापती यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यात आला.
या कार्यक्रमाला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, प्रदेश महिला आघाडी सचिव प्रिया शर्मा, जिल्हाध्यक्ष नंदू परब, प्रेमनाथ म्हात्रे, मंडल अध्यक्ष रितेश फडके, स्वप्निल काठे, अमित धाक्रस अनेक मान्यवर व्यक्ती, व्यापारी संघटना, गुजराथी, मारवाडी, मराठा समाजाचे नेते, महिला वर्ग उपस्थित होते.