".... आणि मी थोडक्यात बचावलो" भारतीय उच्चायुक्तांनी सांगितला खलिस्तानी हल्ल्याचा थरार!
25-Oct-2024
Total Views | 44
नवी दिल्ली :(Canada–India relations) भारत आणि कॅनडा यांच्यातील राजनैतिक संघर्षाचे नवे अध्याय दिवसेंदिवस निर्माण होत असतानात आता एका धक्कादायक गोष्टीचा खुलासा झाला आहे. भारताचे कॅनडातील उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांनी माध्यमांशी बोलताना एका घटनेचा गौप्यस्फोट केला आहे. कॅनडामध्ये असताना काही खालिस्तानी फुटीरतावाद्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामधून मी थोडक्यात बचावलो. भारताच्या आणि भारतीयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे.
भारताच्या दूतवासियांचा कॅनडा सरकारने अपमान केल्यानंतर, भारतीय सरकारने उच्चायुक्तांना मायदेशी परत बोलावले.संजय कुमार वर्मा कॅनडातील अनुभव माध्यमांना सांगताना म्हणाले " कॅनडातील अल्बर्टा शहरात, भारतीय समुदायाने आयोजीत केलेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमाला मी गेलो होतो. कार्यक्रमाच्या हॉल बाहेर १५० खालिस्तानी फुटीरतावाद्यांचा जमाव घोषणाबाजी करत होता. स्थानिक पोलिस प्रशासन तितक्यात घटनास्थळी दाखल झाले, पण त्यांच्या कडून सुद्धा परिस्थिती आटोक्यात येण्याची चिन्हं दिसत नव्हती. ज्या वेळेस माझ्या बायकोसोबत, मी हॉलमध्ये प्रवेश करत होतो, त्या वेळेस एका व्यक्तीने तलावारीचा वार केला, मी २ इंच बाहेर असल्यामुळे थोडक्यात बचावलो. शिखांना आपल्या जवळ किरपान बाळगण्याचा अधिकार आहे, तलवार नाही. या घटनेनंतर मला ताबडतोब सुरक्षितस्थळी पोहोचवण्यात आले. परंतु सदर घटनेनंतर जो पोलिसतपास करण्यात आला त्याच्या बद्दल मला कोणीही काहीही सांगितले नाही."
पालकांनो, काळजी घ्या!
भारतीय मुलांना कॅनडामध्ये उच्च शिक्षणासाठी पाठवण्यासाठी इथले पालक आटापिटा करत असतात, परंतु शिक्षण घेणाऱ्या मुलांचे वास्तव मात्र अत्यंत भीषण आहे, असे संजय कुमार वर्मा म्हणाले. " शिक्षणासाठी विद्यार्थी भारताहून इकडे येतात आणि इथल्या भयाण वास्तवाचे बळी पडतात. एकाच खोलीमध्ये ८ ते १० जणं राहतात. महागाईमुळे शिक्षणासोबत त्यांना छोट्या छोट्या नोकऱ्या सुद्धा कराव्या लागतात. कुणाकडे रोजंदारीवर काम करावं लागतं तर कुठे टॅक्सीवर काम करावं लागतं. हे करता करता त्यांच्या स्वप्नांना मूठमाती कधी मिळते हे त्यांचं त्यांना सुद्धा कळत नाही. दुसऱ्या बाजूला इथली सामाजिक परिस्थीती सुद्धा भीषण आहे. खालिस्तानी फुटीरतावादी अशाच मुलांच्या शोधात असतात, त्यांचा वापर करत आपले धोरण त्यांना तडीस न्यायचे असते. त्यामुळे आपला साधा सरळमार्गी मुलगा दहशतवादी कसा झाला हे त्या पालकांना सुद्धा कळत नाही.
जस्टिन ट्रूडो यांच्या भारतविरोधी धोरणाच्या पार्श्वभूमीवर संजय कुमार वर्मा यांनी केलेले खुलासे धक्कादायक आहेत.