नागपूर, दि.२३: महाविकास आघाडी मुळातच अनैसर्गिक असल्याने असल्याने विदर्भातील जागावाटपावरून सुरू असलेल्या वादात उद्धव ठाकरे यांना कॉंग्रेस लोटांगण घालायला लावत असल्याचा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. यावेळी बोलताना बावनकुळे यांनी 'भाजपा-शिवसेना युतीमध्ये आम्ही मातोश्रीलाच मान द्यायचो.!!' असे आवर्जून नमूद केले.
ते नागपूर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. बावनकुळे म्हणाले, "शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की, ज्या दिवशी शिवसेनाला कॉंग्रेसकडे जावे लागेल ,त्या दिवशी पक्ष बंद करेन. आज ते होताना दिसत आहे. यासाठी सर्वस्वी उद्धव ठाकरे हेच जबाबदार आहेत. कॉंग्रेस कधीही उद्धव ठाकरे यांना स्वीकारणार नाही व सहन करणार नाही. भाजपासोबत युती असताना विदर्भात शिवसेनाला सन्मानजनक जागा देत होतो. महायुती ही नैसर्गिक युती आहे. सर्वच उमेदवार सक्षम आहेत, जागावाटप होत असताना काही उमेदवार जात असेल तर काहीच समस्या नाही. पक्ष सोडलेल्या संदीप नाईक यांच्या जागी रामचंद्र घरात यांची नियुक्ती केल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली. स्वत:च स्वत:चे आत्मचरित्र लिहिल्यावर त्यास समाजमान्यता मिळतेच असे नाही, असा टोलाहीबावनकुळे यांनी अनिल देशमुखांच्या पुस्तकाबाबत लगावला.