मुंबई : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी २०२४ रोजी थाटामाटात संपन्न झाला. ५०० वर्षांचा वनवास संपवून अखेर रामललला आपल्या जन्मभूमीत स्थिरावले. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गजांबरोबरच कलाविश्वातील अनेक कलाकारांनीही हजेरी लावली होती. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतदेखील या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले होते. दरम्याव, राम मंदिरांच्या या ऐतिहासिक सोहळ्यानंतर रजनीकांत यांनी चेन्नईला परतल्यानंतर माध्यमांना महत्वपुर्ण प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "मला खूप चांगलं दर्शन मिळालं. राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर त्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होणाऱ्या लोकांपैकी मी एक होतो. आणि याचा मला अतोनात आनंद आहे. माझ्यासाठी हे राजकारण नसून भक्ती आहे. प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं."
दरम्यान, यापुर्वी देखील रजनीकांत यांनी रामललाचे दर्शन घेतल्यानंतर भावना व्यक्त केल्या होत्या. "हा ऐतिहासिक क्षण आहे. आणि मी खूप भाग्यवान आहे. मी दरवर्षी अयोध्येला जाणार," असेही रजनीकांत म्हणाले होते. दरम्यान, या सोहळ्याला अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, आलिया भट्ट, रणबीर कपूर, विकी कौशल, कतरिना कैफ, जॅकी श्रॉफ अशा अनेक कलाकारांची अयोध्येत उपस्थिती होती.