गुंतवणूक आणणारे महायुती सरकार : मुख्यमंत्री शिंदे

    05-Aug-2023
Total Views | 34
CM Eknath Shinde In Assembly monsoon session

मुंबई
: “अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्य औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या पिछाडीवर गेल्याचे अनेक घटनांमधून सिद्ध झाले आहे. आमचे सरकार सत्तेवर येण्याआधी गुजरात आणि कर्नाटक ही दोन राज्य आपल्या पुढे होती. पण, नव्या गुंतवणुकीमुळे आपण पुन्हा पहिल्या स्थानावर आलो. या अधिवेशनात उद्योग विभागाची श्वेतपत्रिका काढण्याचे धाडस आमच्या उद्योगमंत्र्यांनी केले आहे. त्यामुळे राज्यात गुंतवणूक आणणारे सरकार म्हणजे महायुती सरकार आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केले. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांकडून मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, “आम्ही सत्तेवर येताच बंद पडलेले सगळे प्रकल्प पुन्हा सुरू केले. हे सरकार ‘परफॉर्मन्स’ करणारे, २४/७ काम करणारे सरकार आहे. ‘फेसबुक लाईव्ह’ करणारे आमचे सरकार नाही. गेले वर्षभर ‘सरकार पडणार, मुख्यमंत्री बदलणार’ अशा भविष्यवाण्या केल्या. पृथ्वीराज चव्हाणसुद्धा माझ्या मागे लागले. परंतु, सरकार अधिक मजबूत होत गेले. १७० आमदारांचे पाठबळ आधी होते. केंद्र आणि राज्य सरकारचा कारभार पाहून अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार आमच्यासोबत आले. त्यामुळे आमचे संख्याबळ २१५वर गेले आहे,” असे सांगत महायुती सरकार मजबुतीने पुढे जात असल्याची खात्रीही शिंदेंनी यावेळी दिली आहे.

“ ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यभरात आतापर्यंत (तीन महिन्यांत) १ कोटी, १३ लाख जणांना लाभ मिळाला आहे. त्यांच्यावेळी ’शासन आपल्या घरी’ होते. शिक्षणाचा दर्जा घसरल्याचा आरोप करण्यात आला. पण, हा आरोप करताना त्यांनी ज्या अहवालाचा आधार दिला, तो २०२१-२२चा होता. त्यावेळी कोण मुख्यमंत्री होते? त्यांच्या काळात शिक्षण, उद्योग यांसह टोमण्यांचाही दर्जा घसरला होता,” असे म्हणत शिंदेंनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

साहाय्यता निधीतून १०० कोटींची मदत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सरकारने केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा तर सभागृहासमोर मांडलाच, पण मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाच्या माध्यमातून सुरू असलेल्या रुग्णसेवा यज्ञाची ख्यातीदेखील विशद केली. “मी मुख्यमंत्री झाल्यापासून १०० कोटी रुपये ‘मुख्यमंत्री साहाय्यता निधी’अंतर्गत गोरगरिबांना दिले. मविआच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात फक्त दोन कोटी रुपये वाटले गेले होते. एखाद्या गरीब आणि असाहाय्य व्यक्तीच्या डोळ्यातील अश्रू जर आपण पुसू शकत नसू, तर सरकार आणि मुख्यमंत्रिपदाचा काय फायदा?मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाने केलेली मदत सर्वसामान्य नागरिकांना फायदेशीर ठरली आणि त्यांचे प्राण वाचले,” असेही शिंदे यांनी यावेळी अभिमानाने नमूद केले.

महाराष्ट्राचा ‘महागद्दार’ कोण, ते राज्याला माहिती

“आमच्या ५० आमदारांना ‘खोके’, ‘गद्दार’ म्हणून काही लोक हिणवतात. पण, प्रत्यक्षात ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी, मतदारांशी, परिवाराशी, २५ वर्षे जुन्या मित्राशी गद्दारी केली, तो ‘महागद्दार’ कोण, हे समोर आणायची वेळ आली आहे. महाराष्ट्राचा ‘महागद्दार’ कोण, ते राज्याला माहिती आहे, असे म्हणत संयम बाळगतो याचा अर्थ कधीच तोंड उघडणार नाही, असा घेऊ नका,” असा गर्भित इशाराही शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
पनवेल एसटी डेपोचा विकास प्रकल्प मार्गी लावा; आमदार विक्रांत पाटील यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

पनवेल एसटी डेपोचा विकास प्रकल्प मार्गी लावा; आमदार विक्रांत पाटील यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

पनवेल एसटी डेपो हा महाराष्ट्रातील काही प्रमुख मोठ्या बस आगारांपैकी एक मानला जातो. कोकण, तसेच मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व एसटी बसेसच्या वाहतुकीसाठी पनवेल डेपो महत्वाचा आहे. पनवेल बस डेपोमधून दिवसाला अडीच हजार गाड्या ये-जा करतात. अशा स्थितीमध्ये पनवेल बस डेपोची अवस्था ही फार दयनीय झालेली आहे. अशावेळी पनवेल बस डेपोचा रखडलेला प्रश्न मार्गी लागावा याकरिता तात्काळ कार्यवाही करा, तसेच दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावरही तात्काळ कारवाई करा, अशी मागणी आमदार विक्रांत पाटील यांनी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121