मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी जम्मू काश्मीरमध्ये 'फक्त' ८९ काश्मीरी पंडितांचीच हत्या झाली. 'द केरला स्टोरी' चित्रपटात तीनच मुली पीडित होत्या. अशी वादग्रस्त विधानं केली. यामुळे भाजप आ. अतुल भातखळकर यांनी आझमींचा चांगलाच समाचार घेतला. गेल्या आठवड्यात ‘वंदे मातरम’वरून मोठा गदारोळ झाला होता. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी आम्हाला वंदे मातरम म्हणता येत नाही असं वक्तव्य केल्यामुळे भाजपा आणि शिंदे गटातील आमदार आक्रमक झाले होते.
काश्मीर आणि काश्मिरी पंडितांबद्दल बोलताना अबू आझमी म्हणाले, कश्मीरमध्ये फक्त ८९ पंडितांची हत्या झाली. ७००-८०० मुस्लिम मारले गेले आहेत. हजारो मुली गायब झाल्या, असं सांगण्यात येत आहे. पण, 'द केरला स्टोरी' तीनच मुली पीडित होत्या. द कश्मीर फाइल्स मध्ये दाखवल्याप्रमाणे काहीच घडलेलं नाही. ते सर्व खोट आहे.
आझमी यांचं हे वाक्य ऐकल्यावर पुन्हा एकदा भाजपा आमदार आक्रमक झाले. भाजपा आमदार अतुल भातखळकर आणि अबू आझमी यांच्यात यावरून वाद सुरू झाला. तसेच, अबू आझमी यांच्या वक्तव्यावर शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनीसुद्धा आक्षेप घेतला होता.
अतुल भातखळकर म्हणाले, "एका व्यक्तीचा मृत्यू झाला तरी ती एक व्यक्तीसुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. फक्त ८९ म्हणजे काय? अध्यक्षांच्या माध्यमातून मी अबू आझमीना विचारतोय, या सदनात भाषण करण्यापूर्वी वंदे मातरम म्हणणार की नाही? आधी सांगा वंदे मातरम म्हणणार की नाही? आणि मगच बोला! तुम्हाला या देशात राहायचं असेल तर वंदे मातरम म्हणावंच लागेल."