मुंबई : तब्बल तीन दशकांपासून प्रलंबित असलेला बीडीडी चाळीतील स्टॉलधारकांचा प्रश्न फडणवीस-शिंदे सरकारने मार्गी लावल्याने येथील रहिवाशांनी शासनाचे आभार मानले आहेत, तसेच या प्रश्नाची ठळकपणे दखल घेणारे वृत्त शुक्रवार, दि. ३० जून रोजी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने प्रसिद्ध केले आहे. त्यानिमित्त स्टॉलधाकरकांनी आभार मानत वरळीतील अनेक चौकात त्या आशयाचे भव्य फलक लावले आहेत. “आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक आमदार आणि तत्कालीन ठाकरे सरकारकडे या प्रश्नी पाठपुरावा करुनही आमच्या पदरी निराशा पडली. मात्र फडणवीस-शिंदे सरकारने वर्षभरात किमान पात्रतेच्या संदर्भात निर्णय घेतला आहे. आम्ही त्यासाठी राज्य सरकारचे आभार मानतो,” या शब्दांत वरळीतील स्टॉलधारकांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना गती देत प्रकल्पाचे काम पूणर्त्वास जाण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. त्याच धर्तीवर बीडीडी चाळीतील स्टॉलधारकांच्या प्रश्नांचीही सोडवणूक करण्यासाठी फडणवीसांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची ठरली आहे. बीडीडी चाळीच्या २०७ इमारतींच्या परिसरातील सुमारे पावणेदान हजार स्टॉल्सधारकांना पुनर्विकासात सहभागी करून घेण्याच्या अनुषंगाने एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. दरम्यान, पात्रतेसाठी प्रक्रिया निश्चित करण्यात आल्याने प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याने वरळीकरांनी मानले फडणवीस-शिंदे यांचे आभार स्टॉलधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. “प्रकल्पाच्या संदर्भात स्टॉलधारकांच्या मनात असलेल्या प्रश्नांवर प्रशासनाने तोडगा काढावा आणि आमच्याशी संवाद साधून त्याची माहिती आम्हाला द्यावी,” अशी अपेक्षा येथील रहिवाशी आणि स्टॉलधारकांनी ’मुंबई तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केली आहे.
भाजपकडून ठाकरे पितापुत्रांवर दोषारोप
दक्षिण मुंबई भाजपचे सरचिटणीस दीपक सावंत आणि भाजप वरळी विधानसभा अध्यक्ष दीपक पाटील यांनी या प्रश्नासाठी ठाकरे पितापुत्रांना जबाबदार धरले आहे. ”वरळीचे आमदार असलेले आदित्य ठाकरे अडीच वर्षे मंत्री तर होतेच, पण त्यांचे वडील राज्याचे मुख्यमंत्री होते. असे असूनही ठाकरे पितापुत्रांना स्टॉलधारकांच्या समस्येची सोडवणूक करण्यासाठी वेळ मिळाला नाही. मुळात ठाकरेंना हा प्रश्न सोडावायचाच नव्हता, ते अजूनही आपल्या ऐटीत असून लोकप्रतिनिधी म्हणून असलेली आपली कर्तव्ये ते पूर्णपणे विसरले आहेत,” असे टीकास्त्र भाजप पदाधिकार्यांनी ठाकरे पितापुत्रांवर सोडले आहे.
काही मुद्द्यांवर स्पष्टता होणे आवश्यक - स्टॉलधारक संघ
”पात्रतेचा मुद्दा निकाली काढल्याबद्दल आम्ही सरकारचे आभार मानतो. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतलेल्या पुढाकाराने हा प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र, त्यासोबतच पात्र झालेल्या स्टॉलधारकांचा करार होणे आवश्यक असून ते अद्याप झालेले नाही. पात्रता असूनही काही वर्ष लोटली तरी म्हाडा किंवा प्रशासनाने त्यावर काहीही कारवाई केली नाही. निष्कासित करण्यात आलेल्या स्टॉल्सच्या मालकांना अद्याप तरी कुठलेही भाडे देण्यात आलेले नाही, ते लवकरात लवकर देण्यात यावे अशी आमची भावना आहे. पुनर्विकासाच्या बांधणीच्या आराखड्यात स्टॉल धारकांचा उल्लेख करण्यात आलेला नाही, तो केला तर स्टॉलधारकांमध्ये आपल्या स्टॉलबाबतचे आक्षेप दूर होतील. आम्ही प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला असून यासंदर्भात लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे आश्वासन आम्हाला देण्यात आले आहे,” अशी माहिती बीडीडी चाळ स्टॉलधारक संघाचे अध्यक्ष नंदकिशोर पोयरेकर यांनी ’मुंबई तरुण भारत’शी बोलतांना दिली आहे.
’मुंबई तरुण भारत’च्या बातमीची स्थानिकांकडून दखल
बीडीडीतील स्टॉल धारकांच्या प्रश्नावर सरकारने घेतलेल्या निर्णयाचे वृत्त शुक्रवार, दि. ३० जून रोजी ’मुंबई तरुण भारत’ने प्रसिद्ध केले होते. त्यावर वरळीकरांनी समाधान व्यक्त करत बातमीची दखल घेतली आहे. स्टॉलधारकांकडून वरळीत दहा ते अकरा ठिकाणी ’मुंबई तरुण भारत’च्या बातमीचे बॅनर लावण्यात आले असून आमच्या प्रश्नात सहकार्य केल्याबद्दल आभारही मानले आहेत.