औरंगजेब हसतो आहे

    13-Jun-2023
Total Views | 1671
Editorial On Maharashtra Fadnavis Shinde Government

विसंगतीपूर्ण जाहिराती छापून मोठेपण सिद्ध करता आले असते, तर निवडणुका लढविण्याची गरजच पडली नसती. मूळ मुद्दा निराळा आहे आणि समजून घेण्याशिवाय पर्याय नाही.

महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यात धर्मांध मुसलमानांच्या मनातला औरंगजेब खदखदून बाहेर येतो आहे. गेली अडीच वर्षे महाराष्ट्रात ज्यांचे सरकार होते त्यांच्या राजकारणाचा एक भाग अशांचे लांगूलचालन करणे हा होता. अशा मनोवृत्तीचा विनाश करण्याची वेळ आलेली असताना औरंगजेबाची दुहीची आणि वतनांच्या आमिषातून मराठ्यांच्या हातून घडणार्‍या प्रमादाची वर्णने खरी वाटावी, अशी जाहिरात शिवसेनेकडून प्रकाशित झाली आहे. ज्या सर्व्हेचा उल्लेख या जाहिरातीत करण्यात आला आहे, असे सर्व्हे यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत आले होते. त्यांनी आणि त्यांच्या खुषमस्कर्‍यांनी तर त्यांना ‘बेस्ट सीएम’चा खिताबही देऊन टाकला होता. मात्र, ‘कोविड’ काळात मुंबई महाराष्ट्राची स्थिती काय होती हे आपण सगळेच जाणतो.

‘कोविड’ नंतरही वाझे प्रकरण, गाड्या घेण्यावरून चाललेली साठमारी एक ना अनेक किस्से मंत्रालयाच्या मजल्यांवर आजही सांगितले जातात. सत्ता अनेकदा राजकारण्यांना वास्तवापासून दूर घेऊन जाते. आताही असेच काहीसे झाले आहे की काय असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. या सगळ्याच्या पलीकडे ज्या हिंदुत्ववादी विचारांवर विश्वास ठेवून या सत्तेकडे आशेने पाहणार्‍या कार्यकर्त्यांचा संच आज गोंधळलेला आहे. या कार्यकर्त्यांना सत्तेच्या फळांशी फारसे देणे घेणे नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर असोत किंवा हिंदूसाम्राज्यदिनांची ३५० वर्षे ज्या नैसर्गिक उत्साहाने शासकीय स्तरावर साजरी केली गेली ती नक्कीच सुखावणारी होती. उद्या अशा अवास्तव महत्त्वाकांक्षामुळे हे सरकार डळमळीत झाले, तर हा हिंदुत्ववादी कार्यकर्ता कुणाकडेच आशेने पाहणार नाही.

राजकारण म्हणजे रजो गुणांचा खेळ सर्वसामान्य माणसे करणार नाही, अशा चुका राजकारणात लाखोंचे नायक असणारे राजकारणी करत असतात. असुया, कर्तबगार मंडळींपासून वाटणारी असुरक्षितता ही अनेकदा अशा वागण्याला कारणीभूत असते. अन्य पक्षातल्याच नव्हे, तर स्वत:च्या पक्षातही शीर्षस्थस्थान मिळविलेल्या मंडळींविषयीही सहकार्‍यांच्या अशा भावना असतातच. मात्र त्या चव्हाट्यावर आणण्याचा प्रकार कुठलाच शहाणा राजकारणी करीत नाही. राहिला प्रश्न देवेंद्र फडणवीसांचा तर मुख्यमंत्रिपदाच्या पाच वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीचे मुल्यमापन कोणालाही करता येऊ शकते. इंग्रजीत ज्याला स्टेट्समन म्हटले जाते तसा बकुब त्यांनी कमावला. २०१९ साली जी अभद्र युती महाराष्ट्रात विराजमान झाली तिचा सर्वात जास्त त्रास स्वत: व्यक्तिश: फडणवीसांनीच भोगला. त्यांना अटक करण्यापासून ते त्यांना निरनिराळ्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्नही झाला. मात्र, विरोधी पक्षनेता म्हणून त्यांची कारकिर्दही लक्षात राहणारी होती. सत्ताधार्‍यांमध्ये त्यांचा दरारा इतका भयंकर होता की, मुख्यंमंत्र्यांनीही ज्या काही निवडक फायलींवर सह्या केल्या त्यांनी फडणवीस त्यांच्या डोळ्यासमोर जात नव्हते. अशा माणसाला लहान दाखविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आगळीकच.

मुळातच महाराष्ट्र हे राज्य करायला अत्यंत अवघड राज्य. महाराष्ट्राकडे महाकाय नद्या नाहीत. भौगोलिक परिस्थिती तर इतकी विभिन्न आहे की, कदाचितच असे अन्य कोणते राज्य असावे. कोकणात पूर तर मराठवाड्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य, सर्व साधनसंपत्तींनी युक्त मुंबई तर विकासाच्या मानकांवर मागे असलेले गडचिरोलीसारखे जिल्हे. महाकाय नद्या नाहीत त्यामुळे पंजाब हरियाणासारखे शेती हा इथला मूळ धंदा नाही. या सगळ्याचा परिणाम महाराष्ट्रातली पाच सहा महानगरे सोडली, तर उर्वरित महाराष्ट्रावर होतच असतो. युवकांना शिक्षणानंतर अपेक्षित असलेल्या रोजगाराच्या संधीची वाणवा, त्या न मिळाल्यामुळे होणारी स्थलांतरे, अन्य राज्यांतून रोजगारासाठी येणारे लोंढे त्यांचा इथल्या मनुष्यबळावर होणारा परिणाम. या आणि अशा कितीतरी प्रश्नांशी शिवरायांचा महाराष्ट्र दररोज झगडत असतो. त्यामुळे ज्यांना राज्यशकट हाकायची जबाबदारी मिळाली आहे त्यांनी ती आपल्या संपूर्ण क्षमतेने आणि प्रंसगी जे सहकारी म्हणून लाभले आहेत त्यांच्याकडून सहकार्य मिळवून पूर्ण करावी.

वर उल्लेखलेल्या महाराष्ट्रासमोरच्या तीन-चार आव्हानांशिवाय महाराष्ट्रासमोरचे सर्वांत मोठे आव्हान आहे ते राजकीय स्थैर्याचे. सर्व प्रकारच्या युत्या आघाडी करूनही महाराष्ट्राच्या राजकारणाचा चौकोनी पोत कोणालाही फारसा बदलता आलेला नाही. त्यामुळे शरद पवारांसारख्या चिवट राजकारण्याच्या पक्षाचे जे झाले ते अन्य कुणाचेही होऊ शकते. सगळाच सावळा गोंधळ आहे. आपली क्षमता किती आहे हे आजमाविण्याची वेळ सगळ्यांवरच दीड दोन वर्षांत येणार आहे तोपर्यंत धीर धरावा आणि पराक्रम गाजवून राज्यारोहण करावे. आत्ताच कुरबुरी निर्माण करण्यात काय हशील? या युतीसमोर तीन पक्ष स्पर्धक म्हणून आहेत. हे तिनही पक्ष एकत्र येतात आणि धर्मांधांसोबत हातमिळवणी करतात तेव्हा त्यांना अही महीचे बळ चढते हे आपण अनुभवले आहे. अशा स्थितीत एकत्र राहून काम करणे हेच सगळ्यांच्या हिताचे आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121