आपल्या अल्प अशा आयुष्यामध्ये विलक्षण काम करताना जयंतरावांनी भारतीय विज्ञान तथा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आंदोलनामध्ये भारतीय वैज्ञानिकांनी दिलेल्या योगदानावरील दृष्टिक्षेप यावर मौलिक कार्य केले. भारत सरकारच्या भारतीय स्वातंत्र्याच्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमांतर्गत जयंतरावांनी हा विषय जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वपूर्ण काम केले.
ज्ञान भारती‘चे राष्ट्रीय संघटन सचिव तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक जयंत श्रीकांत सहस्रबुद्धे यांनी शुक्रवार, दि. २ जून रोजी पहाटे ४ वाजता अखेरचा श्वास घेतला. दि. ३ सप्टेंबर, २०२२ रोजी झालेल्या रस्ता अपघातापासून ते प्रकृतीशी निकराने झुंज देत होते. ‘विज्ञान भारती‘चे कार्य विश्वभरामध्ये प्रसारित करण्याचे महत्त्वपूर्ण योगदान जयंतरावांनी दिले. आपल्या अल्प अशा आयुष्यामध्ये विलक्षण काम करताना जयंतरावांनी भारतीय विज्ञान तथा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आंदोलनामध्ये भारतीय वैज्ञानिकांनी दिलेल्या योगदानावरील दृष्टिक्षेप यावर मौलिक कार्य केले. भारत सरकारच्या भारतीय स्वातंत्र्याच्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमांतर्गत जयंतरावांनी हा विषय जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वपूर्ण काम केले. जयंतराव अखेरपर्यंत ‘विज्ञान भारती‘च्या अनेक आयाम तसेच वेगवेगळ्या गतिविधींना मार्गदर्शन करण्याचे व ते कार्यरत ठेवण्याचे कार्य करत होते.
जयंतरावांचा जन्म दि. १७ एप्रिल, १९६६ रोजी गिरगाव (मुंबई) येथे झाला. त्यांचे वडील श्रीकांत सहस्रबुद्धे हे आजही संघ कार्याशी जोडलेले आहेत. त्यांची आईदेखील राष्ट्र सेविका समितीची सक्रिय कार्यकर्ता राहिलेली आहे. जयंतरावांनी मुंबई विश्वविद्यालयातून ‘बीएसी टेक’ (इलेक्ट्रॉनिक्स)पर्यंत शिक्षण घेऊन ‘भाभा टोमिक रिसर्च सेंटर’ या ठिकाणी काही काळ नोकरी केली. संपूर्ण सहस्रबुद्धे परिवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेला असल्याने त्यांच्यावरील संघसंस्कार हे पूर्वीपासूनच रुजलेले होते आणि त्यातूनच १९८९ साली त्यांनी नोकरी सोडून पूर्णवेळ संघ प्रचारक बनून महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये संघ प्रचाराचे कार्य केले. गोवा राज्याच्या विभाग प्रचारकाच्या जबाबदारीनंतर २००१ ते २००९ पर्यंत ते कोकण प्रांताचे प्रांत प्रचारक राहिलेले. संघ प्रचारक हो. वे. शेषाद्री यांचेही ते सचिव राहिलेले आहेत.
जयंतरावांकडे २००९ पासून ‘विज्ञान भारती‘च्या राष्ट्रीय संघटन सचिव पदाचे दायित्व होते. त्यांचे व्यक्तिमत्व नेहमी एक व्यासंगी असेच राहिलेले आहे. त्यांची कला, विज्ञान, स्वामी विवेकानंद आणि विज्ञान तसेच भारतीय वैज्ञानिकांचे जीवन ज्यामध्ये महिंद्र लाल सरकार, प्रफुल्ल चंद्र राय, जगदीश चंद्र बोस, मेघनाद सहा, सर सी. व्ही. रमण इत्यादींवर व्याख्याने अजरामर आहेत.‘विज्ञान भारती‘च्या सर्व गतिविधि, ‘विद्यार्थी विज्ञान मंथन‘, ‘टेक्क फॉर सेवा‘, ‘आयआयएसएफ विश्ववेद विज्ञान संमेलन‘, ‘भारतीय विज्ञान संमेलन‘ इ. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत आहेत. ‘विज्ञान भारती‘चे अनेक आयाम आहेत. जसे ‘वर्ल्ड आयुर्वेद फाऊंडेशन’, ‘जीआयएसटी’ तथा ‘ग्लोबल इंडियन सायंटिस्ट अॅण्ड टेक्नोक्रॅट फोरम’, ‘न्यासा’ तथा ‘नॅशनल आयुर्वेद स्टुडंट्स युथ असोसिएशन’, ‘शक्ती’ इत्यादींना नवी दिशा तसेच मार्गदर्शन देण्याचे कार्य जयंतराव करत होते.
सप्टेंबर २०१८ मध्ये जयंतरावांच्या परभणी येथील प्रवासाबद्दल एक आठवण येथे आवर्जून सांगावीशी वाटते. आपल्या व्यस्त कार्यक्रमातूनही वेळात वेळ काढून जयंतरावांनी परभणी येथे भेट देऊन वेगवेगळ्या विज्ञान चळवळींचे कार्य जाणून घेतले. तसेच, भविष्यामध्ये विज्ञानकार्य अजून प्रभावीरित्या कसे करता येईल, याबद्दल मार्गदर्शन केले. मला त्यांचा प्रवासी प्रबंधक होण्याची संधी लाभली व हे व्यक्तिमत्व जवळून पाहता आले, हे माझे भाग्यच! परभणीमधील दिवसभराच्या कार्यक्रमांमध्ये न कंटाळता परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विविध विभागांना भेट देऊन तज्ज्ञ प्राध्यापक, शिक्षकांशी व शालेय विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. परभणीमधील ‘परभणी अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी’अंतर्गत होणार्या वेगवेगळ्या विज्ञान कार्यक्रमांची माहिती घेऊन त्यामध्ये मोलाचे असे मार्गदर्शन जयंतरावांनी केले. तरुणालाही लाजवेल असा सळसळता उत्साह, लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत संवाद साधण्याची त्यांची हातोटी, कितीही तळागाळाचा कार्यकर्ता जरी असला तरी तो जयंतरावांशी अगदी मनमोकळेपणाने बोलू शकत असे.
सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे आणि त्यानंतरच त्यावर त्या व्यक्तीच्या कलेने त्या शंकांचे समाधान करणे, हे फक्त जयंतरावच करू शकत होते. अशा या विज्ञानात तपस्वीला ‘परभणी अॅस्ट्रोनॉमिकल्स सोसायटी’च्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली.जयंतरावांच्या निधनामुळे विज्ञान कार्यक्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. जरी ती पोकळी भरून निघणारी नसली तरी जयंतरावांनी आखून दिलेल्या या विज्ञान कार्य प्रसारातील मार्गावर सर्व विज्ञानप्रेमींनी कार्य करून विज्ञान तळागाळापर्यंत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करावे व अखिल विश्वाला विज्ञानसंपन्न करावे, या विज्ञान तपस्वीला परिपूर्ण श्रद्धांजली ठरेल.
(‘भारतीय अवकाश संशोधन संस्था’ अर्थात ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष के. सिवन यांना ‘सायन्स इंडिया’चा अंक भेट देताना जयंतराव सहस्रबुद्धे)
(‘भारतीय अवकाश संशोधन संस्था’ अर्थात ‘इस्रो’मध्ये क्रायोजेनिक इंजिन तंत्रज्ञानाच्या विकासात अमूल्य योगदान देणारे पद्मभूषण नंबी नारायणन यांना ‘सायन्स इंडिया’ मासिकाचा अंक भेट देताना जयंतराव सहस्रबुद्धे.)
-प्रसाद वाघमारे
(लेखक परभणी अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी, परभणीचे सहसचिव आहेत.)