मुंबई : द केरळ स्टोरी हा सिनेमा तिकीटबारीवर चालत असेल तर केदार शिंदेना पोटदुखी कशाला होतेय? असा सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. महाराष्ट्रातील नेत्यांनी 'द केरळ स्टोरी'चे मोफत शो आयोजित केल्याने केदार शिंदे संतापले. त्यांनी ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला. त्यांनी लिहिलं आहे, "दुर्दैव...महाराष्ट्रात 'द केरळ स्टोरी' या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातले नेते आयोजित करून लोकांना मोफत दाखवत आहेत. या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने 'महाराष्ट्र शाहीर' प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण? हे तरी माहिती असेल का?" असा सवाल केदार शिंदेंनी उपस्थित केला.
यावर भातखळकर म्हणाले, "द केरळ स्टोरी हा चित्रपट जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. हा चित्रपट केवळ महाराष्ट्रात नाही तर, देशभरात चालतोय. हा सिनेमा चालला तर तुमच्या पोटात का दुखतयं? हिंदुंच्या हिताच्या चार गोष्टी समोर येत आहेत म्हणुन? कोरोनाच्या काळात तुम्हाला न्युझीलॅंडला जावुन रहावसं वाटलं, ही तुमची देशभक्ती. त्यामुळे हिंदुंच्या हिताच्या आड येण्याचा प्रयत्न करु नका."