पावसाचा लहरीपणा तसा सर्वश्रूत. हल्लीतर एकाच वेळी सर्व ऋतूंचा अनुभव मिळतो. च्या याच लहरीपणामुळे मात्र सर्वसामान्यांचे गणित कोलमडते, ज्याचा विचार फारसा कुणी करत नाही. हल्ली राज्याच्या अनेक भागांत अवकाळीचा फटका बसत आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले रब्बी पीक तसेच द्राक्ष आणि आंबा उत्पादकांचेही नुकसान झाले. निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारी मदतीवर विसंबून असलेला, जगाला अन्नबळ देणारा बळीराजा यामुळे अशक्त झाला. एकीकडे पावसाळ्यात दुष्काळाचा अनुभव येत असतो, तर उन्हाळ्यात अवकाळीमुळे शेतकरी हैराण. ज्यावेळी गरज असते, त्यावेळी निसर्गराजाची साथ न मिळाल्याने शेती आणि त्यास अनुसरून असलेले पूरक व्यवसाय पूर्णपणे कोलमडून पडले. एकीकडे ‘कृषिप्रधान देश’ अशी असलेली भारताची प्रतिमा निसर्गाच्या लहरीपणामुळे मेटाकुटीस आली. भूमिपूत्र आज देशोधडीला लागले. यास कारणीभूत निसर्ग असला तरी निसर्गाच्या या अवस्थेस जबाबदार कोण, यावर चिंतन होणेही गरजेचे आहे. अवकाळी असो की, ओला अथवा सुका दुष्काळ, पंचनामे होणार, मदत मिळणार, शेतकर्यांना वीज, पाणी, बी-बियाणे यासाठी आवश्यक कर्जपुरवठा आणि सवलती उपलब्ध होत असतात. त्यांचे कर्जही माफ केले जाते. ऐवढे करूनही शेतकर्यांच्या आत्महत्या मात्र सुरूच आहेत. ही श्रृंखला तोडण्याची गरज असूनही त्याकडे शेतकरीच दुर्लक्ष करत असल्याचे दिसते. अन्य देशांतही निसर्गाचा लहरीपणा असतो. मात्र, तेथील शेतकरी अत्याधुनिक पद्धतीचा अवलंब करून भरघोस उत्पादन घेत असतात. आपल्याकडे कुटुंबातील कलहामुळे शेतीचे आकारमान कमी-कमी होत असून अल्पशेती असेल, तर फारसे प्रयोग केले जात नाहीत. समूह शेतीचा प्रयोग आपले शेतकरी स्वीकारण्यास तयार नाहीत. त्यामुळे पावसाचा लहरीपणा, सरकारी पंचनामे, शासकीय मदत आणि कर्जबाजारी शेतकर्यांच्या आत्महत्या हे सत्र सुरूच आहे. ते थांबवायचे असेल, तर निसर्गाच्या लहरीपणावर विसंबून न राहता, समूह शेतीतून शास्त्रीय प्रयोग करण्याची वेळ आली आहे. तसे झाले, तर अवकाळीचा कितीही फटका बसला तरी बळीराजाचे बळ कधीच कमी होणार नाही.
अवकाळीमुळे रब्बी हंगामावर पाणी फिरले असतानाच, यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याचे भाकीत ‘स्कायमेट’ या खासगी हवामानविषयक अंदाज व्यक्त करणार्या कंपनीने केले आहे. दरवर्षी सरासरी किंवा त्यापेक्षा दोन ते चार टक्के कमी पाऊस होत असतो. तरीदेखील शेतकर्यांचे आणि त्यांना संलग्न असलेल्या अन्य उद्योजकांचे गणित कोलमडत असते. यंदा केवळ ९४ टक्केच पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. ‘स्कायमेट’चे अंदाज नेहमीच खरे ठरत आले आहेत. त्यामुळे आधीच अवकाळीने भिजलेल्या आणि गारपिटीने गारठलेल्या शेतकर्यांना हुडहुडी भरली असून, आता पावसाळ्यातच पाऊस कमी होणार म्हटल्यावर पुढे काय? हा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविकच. अर्थात, भारतीय हवामान खात्याचा अंदाजही आला असून पावसाचा अंतिम अंदाज मे महिन्यातही जाहीर करण्यात येत असतो. त्यात फारसा बदल अपेक्षित नसला तरी किमान जेवढा पाऊस शेती आणि इतर बाबींसाठी आवश्यक असतो, तेवढा होणे गरजेचे आहे, अन्यथा मागणीपेक्षा कमी पुरवठा ही दरी सातत्याने वाढत जाईल आणि एक दिवस पाण्यासाठी खरोखरच दाहीदिशा भटकंती करायची वेळ येऊ शकते. प्रशांत महासागरातील बदलांवर ऋतुमानाचे चक्र बर्याच अंशी अवलंबून असते. त्यातूनच ‘अल-निनो’ लहरींचा प्रभाव असणे किंवा नसणे, यावर हवामानातील बदल ठरतात. उन्हाळ्यात अचानक गारवा, पावसाळ्यात जीवाची काहिली होणे आणि हिवाळ्यात अवकाळी याची आता सर्वांनाच सवय झाली असली तरी पीकपाण्याला तशी सवय नाही. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया जात असते. गेल्यावर्षी समाधानकारक झालेल्या पावसामुळे खरीपाचे उत्पन्न भरघोस झाले. त्यामुळे उत्साहित झालेल्या शेतकर्याने हिवाळ्यात येणार्या रब्बी पिकाचे नेटके नियोजन केले. मात्र, अवकाळीमुळे हातातोंडाशी आलेले रब्बीचे पीकही गेले. त्या चिंतेत असलेल्या बळीराजाला राज्य आणि केंद्राने मदतीचा हात दिला असला तरी येत्या काळात रुसलेला वरुणराजा खरोखरच प्रसन्न होईल काय? की रौद्ररुप धारण करेल, हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रांनी बदलत्या परिस्थितीत जुळवून घेणे, हीच काळाची गरज आहे.
-मदन बडगुजर