मुंबई : संभाजीनगर जिल्ह्यातील किराडपुरा भागात काल दोन गटात राडा झाला. या राड्यात एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, यावर बोलताना खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. संभाजीनगरमध्ये काल झालेली दंगल ही सरकार पुरस्कृत होती. येत्या 2 तारखेला संभाजीनगरात महाविकास आघाडीची सभा होणार आहे. ही सभा होऊ नये म्हणूच संभाजीनगरात तणाव निर्माण करण्यात आला आहे. तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारची शेवटची धडपड सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
पुढे ते म्हणाले, "राज्यात दंगली घडवल्या जात आहे. दंगली घडवणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही. पण काहीही केलं तरी आमची सभा होणारच. महाविकास आघाडीचे नेते या सभेला हजर राहतीलच. राज्यात गृहमंत्र्यांचं अस्तित्वच दिसत नाही. गृहमंत्र्यांचं अस्तित्व फक्त विरोधकांवर खोटे खटले दाखल करण्याचे आदेश देण्याइतपत आहे. तेही सध्या मुख्यमंत्रीच देत आहेत. जे विरोधी पक्षाचे लोक आहेत, आजही त्यांच्यावर खोट्या कारवाया करणं, जुनी प्रकरणं काढून गुन्हे दाखल करणं सुरू आहे. या राज्यात असं कधी झालं नव्हतं. पण लक्षात ठेवा डाव उलटा पडला तर उद्या आम्ही सत्तेवर येऊ. तेव्हा तुम्हाला याची उत्तरं द्यावी लागतील."
"गुजरातमध्ये भाजपचं सरकार आहे. तिथे दंगल झाली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात दंगल झाली नाही. तेव्हाही रामनवमी होतीच ना. तुमच्याच राज्यात दंगल का होते? कारण तुम्ही काही लोकांना दंगलीसाठी स्पॉन्सर्ड करत आहात. समाजात तेढ निर्माण केली जात आहे. त्यांना शांतता नको आहे. उद्धव ठाकरेंना मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यांना भविष्य दिसतंय. म्हणून त्यांची शेवटची धडपड सुरू आहे," अशी टीका राऊतांनी केली.