"चुंबन प्रकरणासाठी एसआयटी स्थापन होऊ शकते तर, बार्शी प्रकरणात का नाही?"
- संजय राऊतांचा सवाल
21-Mar-2023
Total Views | 89
13
मुंबई : अमृता फडणवीस तसेच शीतल म्हात्रेंसारख्या प्रकरणात एसआयटी स्थापन होते, मात्र बार्शी येथील गरीब मुलीचं रक्त सांडलं तिथे काहीही कारवाई का होत नाही, असा सवाल उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते म्हणाले, "का चुंबनाच्या व्हिडिओवरून एसआयटी स्थापन केली जाते. पण मी रक्ताच्या थारोळ्यात सापडलेल्या एका मुलीचा फोटो ट्विट करून मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल होतो. ही या राज्याची कायदा, सुव्यवस्था काही लोकांच्या कोठ्यावर नाचतेय, हे यावरून स्पष्ट दिसतंय." अशा शब्दात राऊत यांनी टीकास्त्र सोडले.
बार्शीत अत्याचाराची तक्रार दिल्याचा राग मनात धरून एका अल्पवयीन मुलीवर हल्ला झाला. त्याचाच फोटो संजय राऊतांनी ट्वीट केला. यावेळी त्यांनी सरकारवर टीकास्त्रही सोडले. यावर स्पष्टीकरण देताना मी काय चुकलो? असा उलट सवाल उपस्थित करत राज्याची कायदा-सुव्यवस्था काही लोकांच्या कोठ्यावर नाचतेय असा गंभीर आरोप राऊतांनी केला.
"मी काय चुकलो? या मुलीवर कोयत्याचे वार झाले आहेत, या मुलीची आई माझ्याशी बोलली, तिच्या आईनं आक्रोश करत सरकारकडे ‘जर माझ्या मुलीला न्याय मिळाला नाही, तर मला इच्छामरणाची परवानगी द्या’ अशी मागणी केली आहे.पारधी समाजातली ही मुलगी आहे. बार्शीतल्या काही गुंड टोळ्यांनी तिच्यावर निर्घृणपणे हल्ला केला. अजूनही काही मुख्य आरोपी बाहेर आहेत.जर मी दिल्लीत असताना मुख्यमंत्र्यांपर्यंत तो विषय पोहोचवायचा असेल तर मी ज्या माध्यमातून पोहोचवायला हवा, त्या माध्यमातून पोहोचवला आहे.” असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
हक्कभंग समितीचे अध्यक्ष राहुल कुल यांच्याविरोधातील शेतकरी आंदोलन मी पुढे घेऊन जाणार असल्याचा इशारा संजय राऊत यांनी दिलाय. ते म्हणाले, "हक्कभंग समितीला मी भूमिका मांडली. त्यावरून मला उत्तर द्यायचंय. हक्कभंग समितीत तक्रारदारालाच महत्त्व दिलंय. तेच न्यायाधीश होते. ज्यांनी तक्रार केली तेच न्यायाधीशाच्या भूमिकेत आहेत. ज्यांच्या साखर कारखान्यावरून मी भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत, ते राहुल कुल हक्कभंग समितीचे अध्यक्ष आहेत. भीमा पाटस साखर कारखान्यात ५०० कोटींचं मनी लाँडरींग झालंय. शेतकरी रस्त्यावर उतरलेत. ते आंदोलन मी पुढे घेऊन जाणार आहे."