“ज्याप्रमाणे आम्ही आपल्या वाडवडिलांचें स्मरण कायम ठेवून त्याच्या योगें आपल्या घराण्याचा पूर्वापार चालत आलेला लौकीक राखण्याचे एक साधन करून ठेवितो, तद्वतंच राष्ट्रांतील महापुरुषांचे स्मरण हे राष्ट्रीयत्व कायम राहण्यास एक चांगले साधन आहे.” - लोकमान्य टिळक (केसरी, २८ एप्रिल १८९६)
उपरोक्त एका वाक्यात लोकमान्य टिळक इतिहासाच्या अभ्यासाचे महत्व सांगतात. घरातील वडिलधाऱ्यांच्या शिकवणुकीशिवाय जसा घराचा लौकीक जपता येत नाही, त्याचप्रमाणे राष्ट्रीय चरित्रांचे मर्म जाणून आचरणात आणल्याशिवाय राष्ट्रीयत्व जपता येत नाही. हे तत्व नेमके जाणून महाराष्ट्रात स्वतःचे आयुष्य इतिहास संशोधन, लेखन आणि प्रचारास वाहून घेतलेल्या मराठी इतिहासकारांची एक फळीच निर्माण झाली. श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे या परंपरेचे पाईक होते. इतिहासाचार्य राजवाडे, ग.ह. खरे यांनी इतिहास संशोधन, विवेचन यांचा पाया रचल्यावर बाबासाहेबांनी यावर आणखी कळस चढवला. बाबासाहेबांनी सामान्य व्यक्तीस समजण्यास अवघड अशा कागदपत्रांमधील इतिहास बाहेर काढला; पोवाडे, किर्तने, वग, बखरी अशा लोकसाहित्यांतील अलंकार त्यास घातले; पण असे करताना इतिहासपुरूषाचे मुळरुप त्यांनी बदलले नाही, इतिहासशास्त्राशी त्यांनी बेईमानी केली नाही.
इतिहास समाजासमोर मांडताना बाबासाहेबांचा काय उद्देश होता, हे त्यांनीच आपल्या शिवचरित्राच्या दुसऱ्या खंडाच्या प्रस्तावनेत सांगून ठेवले आहे, “इतिहासाचा ‘अभ्यास’ करणें ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे इतिहासाचा ‘उपयोग’ करणें हीही महत्त्वाची गोष्ट मी मानतो. इतिहासावरती विवेचनपूर्वक ग्रंथ लिहून त्यांत घटनांची मीमांसा व तौलनिकदृष्ट्या त्यांचे मूल्यमापन करणें, हा अतिशय महत्त्वाचा उद्योग असतो. तो व्हावयास हवाच. म्हणजेच इतिहासावर विद्वत्तापूर्ण ‘भाष्यें’ निर्माण झालीं पाहिजेत. त्याचप्रमाणे इतिहासावर पोवाडे, नाटकें, कथा, कांदबऱ्या, चित्रपट, शिल्पकृति, चित्रकृति इत्यादी ललित कृति निर्माण झाल्याच पाहिजेत. हें दोन्हीही घडलें तरच इतिहासाचे मर्म आणि मोल जनमनांत ठसतें. त्यांतूनच राष्ट्राला काही एक व्यक्तिमत्त्व प्राप्त होतें. म्हणजेच इतिहासाचा ‘अभ्यास’ जितका महत्त्वाचा, तेवढाच त्याचा ‘उपयोगही’ महत्त्वाचा.” हा असा उपयोग करण्याचा बाबसाहेबांनी ध्यास घेतला होता, तेच आपले जिवितध्येय मानून ते झटत असत. यातूनंच ‘जाणता राजा’ निर्माण झाले आणि आता आपल्यासमोर साकारते आहे ‘शिवसृष्टी’!
मी बाबासाहेबांना सर्वप्रथम भेटलो २०१५ साली. बाबासाहेबांना मला मोडीलिपी थोडीफार लिहिता-वाचता येते हे कळलं. त्यांनी अगदी थोडक्यात मला काही मुलभूत गोष्टी समजावून सांगितल्या, ऐतिहासिक कागद कसे वाचावेत, हे सांगितलं. दुसरी भेट तर माझ्यासाठी पर्वणी होती. तो क्षण मला आजही लख्ख आठवतो. बाबासाहेब आल्यावर, त्यांची आणि माझी नजरानजर झाली फक्त आणि मी अक्षरशः जागेवर थिजलो. तितक्यात डफावर थाप मारावी, इतक्या उस्फुर्ततेने शब्द उमटले, "नमस्काs र !" त्या शब्दात अदब होती, उत्साह होता, माया होती, आणि खरं सांगू ? लहान मुलाइतकीच निरागसताही होती !” मी शिक्षणानिमित्त खान्देशात (धुळे) राहतो, हे त्यांना कळलं आणि त्यांनी प्रश्न केला, “खान्देशातलं ‘सारंगखेडा’ माहिती आहे का तुम्हाला? तिथे दत्तजयंतीच्या यात्रेत घोड्यांचा बाजार असतो. आपल्या शिवसृष्टीत घोडे हवेत ना? लोकांना घोडेस्वारी कशी करतात, घोड्यावर मांड कशी टाकतात, हे प्रत्यक्ष पाहता यायला हवे.” त्यापुढेही ते त्यांच्या कल्पना बोलून दाखवत होते.
बाबासाहेबांचा शिवसृष्टीचा ध्यास मला ठाऊक होता; पण प्रत्यक्ष त्यांच्याकडूनंच ऐकताना मला त्याच्या भव्यतेची कल्पना यायला लागली. ते ऐकता ऐकता त्या भव्यतेची कल्पना करून माझ्या हृदयाचे ठोके वाढत गेले. थोडा वेळ गेला, मी त्यांना काही शंका विचारल्या. उत्तर देता देता म्हणाले, “आपल्या घरी या एकदा! घरी जुनी पुस्तकं, कागद, शस्त्रं आहेत. पहा तुम्ही” मी भारावून गेलो. ‘शिवरायांचे कैसे सलगी देणे’ हे मी प्रत्यक्ष अनुभवत होतो. काय विलक्षण गुण होता या माणसामध्ये! भेटेल त्या व्यक्तीशी इतक्या स्नेहाने बोलणं, माया करणं कसं जमायचं? आयुष्यभर पाहिलेलं स्वप्न, त्यासाठी घेतलेले कष्ट यांचा कुठलाही अहंकार बाळगता अगदी सहज ‘आपली शिवसृष्टी’ असं ते म्हणत. त्यांच्या घरातील हा ठेवा म्हणजे ते ‘राष्ट्रीय संपत्ती’ मानत, ती सर्वांना पाहता यावी, त्यांचा उपयोग तरुणांना प्रेरणा देण्यासाठी व्हावा असे त्यांना मनापासून वाटे.
२०१८ साली बाबासाहेब बोरिवलीला आले होते. तेव्हाचे त्यांचे प्रखर शब्द मला आठवतात, “तुम्ही आजचे तरुण-तरुणी एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून, गळ्यात गळे घालून फिरता; कधी एकमेकांना विचारा, “तुझी महत्वाकांक्षा काय? तुझं स्वप्न काय?” काहीतरी बँकेची, शाळेतली नोकरी करावी न् सेटल व्हावं या असल्या कसल्या इच्छा बाळगता? कोण्या उदात्त गोष्टीचा ध्यास घ्या, त्यापाठी वेडे व्हा! वेडे व्हा!” हा मंत्र स्वत: बाबासाहेबांनी आचरणात आणला होता. या उदात्त ध्येयापाठी ते अखेरच्या क्षणापर्यंत वेडे झाले होते. “आता हे कोरोना वगैरे संपू दे. काही जुने वाडे वगैरे प्रत्यक्ष जाऊन पहायचे आहेत. तिथली वैशिष्ट्यं आपल्याला शिवसृष्टीत दाखवता येतील, असं ते म्हणायचे.” हा त्यांचा ध्यास आज सत्यात उतरत आहे. इ. एच्. कार (E. H. Carr) यांचे What is history? हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
त्यात ‘बी. क्रोचे’ या तत्ववेत्त्याचा संदर्भ देऊन ते बोलतात, “history consists essentially in seeing the past through the eyes of the present and in the light of its problems, and that the main work of the historian is not to record, but to evaluate; for, if he does not evaluate, how can he know what is worth recording?” थोडक्यात इतिहास म्हणजे काही फक्त सनावळ्या, संदर्भ आणि तथ्ये नव्हेत. फक्त ही घटिते मांडणे एवढेच इतिहासकाराचे काम नव्हे, तर त्याला वर्तमानस्थितीवरून इतिहासाच्या घटनांचे मुल्यमापन करता यायला हवे. बाबासाहेबांनी शिवचरित्र अभ्यासाचा, लिखाणाचा ध्यास घेतला, तेव्हा देश पारतंत्र्यात होता. त्या पार्श्वभुमीवर बाबासाहेबांच्या कार्याचे अतुलनीय महत्व आपल्याला समजते. इतका त्याग केल्यानंतरही ‘तृप्ति जालिया जैसीं । साधनें सरती आपैसीं । देखें आत्मतुष्टीं तैसीं । कर्में नाहीं ॥’ या ज्ञानदेवांच्या उक्तीनुसार ‘राष्ट्राय स्वाहा, इदं न मम्॥’ ही वृत्ती पाहिली, म्हणजे मस्तक आपोआप शिवशाहीरांच्या चरणांवर लीन होते.
- डॉ. सागर पाध्ये
"