नवी दिल्ली : भारतीय समुद्र सीमेच्या हद्दीत मालवाहू जहाजांवर अलीकडेच झालेल्या हल्ल्यांनंतर, भारतीय नौदलाने सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. दि.३१ डिसेंबर २०२३ रविवारी भारतीय नौदलांनी व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी 'विध्वंसक' आणि 'फ्रीगेट्स'ची तैनाती केली आहे. भारताच्या समुद्र सीमेच्या हद्दीत कोणतीही अनूचित घटना घडल्यास नौदलाने व्यापारी जहाजांना सुरक्षा प्रदान करण्याची तयारी पूर्ण केली आहे.
इस्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर लाल समुद्र, एडनचे आखात आणि मध्य अरबी समुद्रात मालवाहू जहाजांवर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर नौदलाने हा निर्णय घेतला आहे. इस्रायल-हमास युद्ध सुरु झाल्यापासून, हमासच्या समर्थनार्थ यमनच्या हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.