"फुकटात काहीच मिळालं नाही पाहिजे" - राजकारणातील रेवडी कल्चरवर नारायण मूर्तींची टीका
01-Dec-2023
Total Views | 66
बंगळुरू : “लोकांना दिलेल्या सेवा आणि अनुदाने. त्या बदल्यात त्यांच्याकडून काहीतरी मागितले पाहिजे, जे त्यांच्यामध्ये स्वतःसाठी काहीतरी करण्याची इच्छा जागृत करेल आणि त्यांच्या भविष्यासाठी चांगले होईल." असे विधान इन्फोसिस कंपनीचे संस्थापक एन. नारायण मूर्ती यांनी केले आहे.
देशात नुकत्याच पाच राज्यांमध्ये निवडणूका पार पडल्या आहेत. या निवडणूकांमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणावर सरकारी सुविधा मोफत देण्याची घोषणा केली होती. याच पार्श्वभूमीवर एन. नारायण मूर्ती यांनी हे वक्तव्य केले. त्यांनी राजकीय पक्षांना विनंती केली की, "फुकटात काहीही देण्यापासून दूर राहिले पाहिजे त्यापेक्षा मोफत वीज, पाणी किंवा अन्नधान्याच्या बदल्यात लोकांकडून काही मोबदला घ्यायला हवा." असे विधान त्यांनी केले.
एन. नारायण मूर्ती बंगळुरू येथे टेक समिटमध्ये बोलत होते. ते म्हणाले, "उदाहरणार्थ, जर सरकार एखाद्याला मोफत वीज देत असेल, तर त्या बदल्यात ते लोकांना त्यांच्या मुलांची शाळेतील उपस्थिती सुधारण्यास सांगू शकते, तरच त्यांना मोफत वीज मिळेल. मी मोफत सेवा आणि अनुदानाच्या विरोधात नाही. मला हे चांगलं समजतं, कारण एकेकाळी मीही गरीब कुटुंबातून आलेलो होतो. पण असा काही परतावा मिळणे त्यांच्या भावी पिढ्यांसाठी चांगले असेल.”
नारायण मूर्ती यांनी देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी नागरिकांनी अधिक कर भरण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. ते म्हणाले की,"भारतात प्रभावी आणि भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था निर्माण करायची असेल तर विकसित देशांप्रमाणेच आपल्याला निश्चितपणे अधिक कर भरावे लागतील. वैयक्तिकरित्या, मला जास्त कर भरावा लागल्यास मला कोणतीही अडचण नाही."