कल्याण : ‘केडीएमटी’ उपक्रमांतर्गत बसेस कल्याण, पनवेल, नवी मुंबईसह भिवंडी मार्गावर चालविल्या जातात. शहरातील रस्त्यावर धावणार्या बसेसची संख्या कमी असल्याने प्रवाशांना रिक्षावर अबलंबून राहावे लागत आहे. सर्वसामान्यांना रिक्षा भाडे परवडत नाही. त्यातच रिक्षाचालकांची मुजोरीही सहन करावी लागते. त्यामुळे अपुर्या बसेसमुळे परिवहन सेवेचा उपयोगच काय? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहे.
शहरातील रस्त्यावर धावणार्या बसेसची संख्या अपुरी आहे. रिक्षावाले वारेमाप भाडे आकारतात. परिवहन समितीची स्थापना लोकांना परिवहनची सेवा मिळावी, स्वस्त दरात प्रवास उपलब्ध व्हावा, यासाठी करण्यात आली. पण, सध्याची परिस्थिती पाहता शहरात विविध मार्गांवर अंदाजे ४३ बस धावत आहेत. या व्यतिरिक्त पनवेल, भिवंडी, वाशी, नवी मुंबई या मार्गावर २७ बस धावत आहेत.
नागरिकांना अपुर्या बसेसमुळे बसस्टॉपवर ताटकळत उभे रहावे लागते. तासंतास बस न मिळाल्याने अखेर रिक्षाने जाण्याचा पर्याय नागरिक निवडतात. त्यामुळे परिवहन सेवेबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे. नागरिकांनी भरलेल्या करातून ‘केडीएमटी’ कामगारांना पगार दिला जातो. पण, लोकांना सेवा कुठे मिळते, असा सवाल नागरिक विचारत आहे. कामानिमित्त लोक कल्याणला येत असतात. अनेकांना रिक्षाचे भाडे परवडत नाही. बसचा पर्याय निवडला तर तासन्तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागते.
२०७ ई-बस भाडेतत्त्वावर
‘स्मार्ट सिटी प्रकल्पां’तर्गत १५व्या वित्त आयोगातून आलेल्या निधीतून २०७ ई-बस भाडेतत्त्वावर चालविल्या जाणार आहेत. युरो बसचे कंत्राट कॉसिस मोबिलिटी आणि बुथेलो कंपनीला दिले आहे. पहिल्या टप्प्यात कॉसिस मोबिलिटी १०७ बस, तर दुसर्या टप्प्यात बुथेला कंपनीकडे १०० बस पुरविण्याची जबाबदारी आहे. त्यापैकी सध्या दहा बसेस ‘केडीएमटी’च्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. आता या बसेस रस्त्यावर धावू लागल्या नंतर प्रवाशांचा त्रास कमी होईल का, हे पाहावे लागेल.
पांढरा हत्ती का पोसायचा?
परिवहनचे २०१७ मध्ये पाच लाख रुपये उत्पन्न होते. हेच उत्पन्न आजही आहे. महापालिका कर्मचार्यांना पगार देते. डिझेल महापालिका पुरविते. हे सर्व मिळत असताना २०० पैकी ६० बसेस रस्त्यावर चालविल्या जात आहेत. १४० बसेस या पडून आहेत. २०० बसेससाठी २०० वाहकसुद्धा आहेत. त्यापैकी ६० चालक, वाहकांचा वापर केला जात आहे. बाकी कर्मचार्यांना काय फुकटचा पगार दिला जातो? पांढरा हत्ती का पोसायचा? असा सवाल प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.
पूर्वी ज्या मार्गावर बससेवा चालू होती. त्या मार्गावर काही कालवधीपासून बससेवा बंद आहे. ते मार्ग सुरू करण्याकरिता आमची सकारात्मक चर्चा सुरू असून, लवकरच सुरू होतील. नवे मार्गही सूचविले जात आहेत. 2017 मध्ये असलेल्या बसेसची संख्या आणि सध्या सुरू असलेल्या बसेसची संख्या यात फरक आहे. सध्या परिवहन सेवेतून पाच लाख रुपये उत्पन्न मिळत आहेे.