नवी मुंबई : शब्दांमधील अक्षरांमध्येही ‘बिटविन द लाईन्स’ असे भाव असतात हे सुलेखनकार अच्युत पालव यांच्यामुळे समजले अशा शब्दात त्यांच्या सुलेखनाचा गौरव करीत त्यांची अक्षरावर हुकूमत पाहून थक्क व्हायला होते अशा शब्दात नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. लहानपणापासून अक्षर चांगले असल्याने सुलेखनाची आवड होती आणि चांगले अक्षर प्रेम करायला लावते याची जाणीव असल्याने अच्युत पालव यांच्याकडून सुलेखनाचे धडे घ्यावेत अशी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. ती कामाच्या व्यस्त दिनक्रमात पूर्ण होऊ शकली नाही तरी आज अच्युत पालव लिखीत सुलेखनावरील पुस्तकाचे प्रकाशन करण्याचा योग लाभला ही आपल्यासाठी आनंददायी गोष्ट असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
बेलापूर रेल्वे स्टेशन कमर्शिअल कॉम्प्लेक्स आणि अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अक्षर दिवाळी’ कार्यक्रमांतर्गत सुलेखनकार अच्युत पालव यांच्या कॅलिग्राफीवरील ‘चान्सरीग्राफी’ या नवीन पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते बेलापूर रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्स येथे संपन्न झाला. याप्रसंगी सुलेखनकार अच्युत पालव, बेलापूर रेल्वे स्टेशन कमर्शिअल कॉम्प्लेक्सचे संचालक भार्गव, ऊर्जा प्रकाशनच्या प्रमुख श्रध्दा पालव, कॉम्प्लेक्सचे पदाधिकारी वैभव महाजन आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना सुलेखनकार अच्युत पालव यांनी चांगले लिहिण्याची लहानपणापासून लागलेली आवड, सुलेखनकलेची जोपासना करण्यासाठीचे श्रम व या कलेला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न याविषयीच्या विविध आठवणी सांगितल्या. जगभरातील लोकांपर्यंत आपल्या देवनागरीचे महत्व नेता आले, मोडी लिपीचे वेगळेपण प्रसारित करता आले याचे एक वेगळे समाधान असल्याचे ते म्हणाले. ‘चान्सरीग्राफी’ हे चान्सरी शैलीतील कॅलिग्राफीचे मॅन्युअल स्वरूपातील पुस्तक ही शैली शिकण्याच्या मूलभूत गोष्टींशी ओळख करुन देईल. त्यादृष्टीने लिहिताना बसण्याच्या योग्य पध्दतीपासून, कागद ठेवण्याची व पेन पकडण्याची पध्दत सांगण्यासोबतच अक्षर लेखनाची तयारी आणि सरावही करुन घेईल अशी माहिती त्यांनी दिली. ‘चान्सरीग्राफी’ हे पुस्तक म्हणजे अक्षर चांगले व्हावे अशी इच्छा असणा-यांसाठी तसेच मुलांचे अक्षर चांगले व्हावे असे वाटणा-या पालकांसाठी दिवाळीचा अक्षरमेवा असून दिवाळीची भेट म्हणून हे पुस्तक दिल्यास ते अनेकांसाठी सुलेखनाची प्रेरणा ठरेल असेही मत त्यांनी व्यक्त केले.