आम्ही आणि आमची पर्यावरणपूरक दिवाळी

    10-Nov-2023
Total Views | 192

Diwali

“आई… ऐक ना. मला असं वाटतंय की या वर्षीपासून आपण पारंपरिक पद्धतीने, साधेपणाने दिवाळी साजरी केली तर….म्हणजे निदान आपण आपल्याकडून तरी परंपरा जपू. पर्यावरणपूरक सण सुद्धा यातून साजरा होईल.” अगदी माझ्या मनातलं बोललीस की, चिमणे. हे सणवार असताच मुळी परंपरा, साधेपणातून निर्मळ आनंद देणारे. आमच्या लहानपणी आईने ३-४ रुपये जरी फटाके आणण्यासाठी हातावर टेकवले तरी आभाळ हातात मिळाल्याचा आनंद व्हायचा ग. नाही तर आताच्या तुमच्या पिढीच्या हातात ४-५ हजारांचे फटाके आणले तरी ते कमीच वाटतात. हे संवाद एका मैत्रिणीच्या घरी असताना कानावर पडले आणि क्षणात काही आठवणी आणि किस्से डोळ्यांसमोर समोर आले.
 
मागील काही वर्षांपासून आमच्या घरी मी, माझे बाबा, आई, दादा आणि आता वहिनी हौसेने पर्यावरणपूरक सण, उत्सव साजरे करण्याचा प्रयत्न करतो. शाळेत असताना कुठेतरी ऐकलेले की, फटाके फोडल्याने प्रदूषण होते आणि मी इयत्ता सातवीत असताना ठरवून टाकले, या वर्षीपासून मी फटाके तर काय, साधी सुरसुरीही पेटवणार नाही. माझ्याकडून तरी निदान पर्यावरणाला अनुकूल अशी गोष्ट घडावी हा हेतू. पहिल्या वर्षी मी फटाक्यांसाठी बाजूला काढलेल्या पैशातून दिवाळीत एक जास्तीचा ड्रेस घेतला खरा. पण या जास्तीच्या ड्रेस ऐवजी मला अत्यंत प्रिय असणाऱ्या पुस्तक वाचनाचा वसा राबवण्याचा निर्णय त्याच्या पुढच्या वर्षापासून म्हणजे २०१३ साली घ्यायचे ठरवले. दरवर्षी नोव्हेंबर – डिसेंबर महिन्यात नाशिक शहरात पुस्तकांचे प्रदर्शन आणि विक्री असते. नेमाने या काळात पुस्तके विकत घेत वाचल्याने वाचनाचा छंद वृध्दींगत होत गेला जो आज तागायत सुरू आहे.
 
बरं…या उपक्रमात माझी मैत्रीण ‘ख्याती जोशी’ देखील जोडली गेली. आम्ही दोघी प्रदर्शनातील पुस्तके ठरवून घेतो. उदाहरणार्थ मी एखादे पुस्तक घेतले असेल तर ख्याती तेच पुस्तक अजिबात खरेदी करणार नाही आणि हेच माझ्या बाबतीत देखील लागू होते. यामुळे आमच्यात पुस्तकांची अदलाबदल करणे होत असते तसेच वाचन देखील वाढायला अधिक मदत होते. या उपक्रमाचा परिणाम इतका सुंदर झाला की माझ्या घरात माझे स्वतः चे का होईना…लहानसे बुकशेल्फ तयार झाले आहे. स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. सुमती क्षेत्रमाडे, वपु काळेंपासून ते प्रशांत केंदळे, किरण सोनार, विश्र्वास ठाकूर आदी लेखकांची पुस्तके या माझ्या बुकशेल्फ संग्रही आहे. आमच्यातील वाचनाची आवड याच पुस्तक वसामुळे जोपासली गेली. महत्त्वाचे म्हणजे या कल्पक उपक्रमाला आम्हा दोघींच्या कुटुंबीयांचा कायमच पाठिंबा राहिला आहे.
 
पणत्या, रांगोळ्या यांचे आम्हा लोकांना भारी आकर्षण. पण त्यातही प्लास्टिकच्या पणत्या आणणे कटाक्षाने टाळले आहे. आमच्याकडे दरवर्षी आईचा माळ्यावर ठेवलेल्या जुन्या मातीच्या पणत्या भिजत घालून, स्वच्छ करून उन्हात वाळत घालते. एकदोन वर्ष मी या पणत्या आईने स्वच्छ करून ठेवल्यावर रंगकाम केलेले. काय गंमत वाटलेली सांगू… एकदा तर ऐन दिवाळीत पावसाची चिन्हे दिसू लागली आणि आपल्या महावितरण कंपनीने नेमकी वीज घालवली. अंगणात, गॅलरी, आणि गच्चीवरील पणत्या इतक्या प्रखर आणि सुंदर पद्धतीने उजळत होत्या की अंधारात चमकणाऱ्या काजव्यांचा भास व्हावा. डोळ्यांचे खऱ्या अर्थाने पारणे फिटले. महागड्या दिव्यांच्या माळा आणल्या तरी या नजाऱ्यासमोर फिक्याच. या क्षणाला मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह काही आवरता आला नाही. सिडकोच्या घराचं एवढंस अंगण त्यात आमच्या अंगणात चार – चार रांगोळ्या. बाजारात जाऊन रंगीबेरंगी रांगोळ्या आणायच्या. बरं या रांगोळ्या खरेदी करताना कोणता रंग घरात आहे नि कोणता नाही याच्यात बऱ्याचदा गोंधळ होतो.
 
सरते शेवटी रांगोळ्यांची खरेदी होऊन रांगोळ्यांच्या डब्यात भरल्या गेल्यावर आमची दिवाळी सुरू झाल्याचा अनुभव येतो. मी जेमतेम बरी रांगोळी काढते पण माझी आई आणि वहिनी यात निष्णात. या दोघींनी काढलेली आखिव-रेखीव अप्रतिम रांगोळी पाहिली की आपणही आपल्या परीने प्रयत्न करावा असे वाटते. आई जवळपास रोजच रांगोळी काढत असली तरी दिवाळीत उत्सुकता असते ती बाबांनी काढलेल्या रांगोळीची. बाबांनी एखाद्या दिवाळीत दारापुढे रांगोळी काढली नाही असे कधीच होत नाही. बाबांचा उत्साह पाहायला गल्लीतले लोक जमा होतात. बाबांच्या रांगोळीत रंग भरायला आजूबाजूची लहान मुले तयार असतातच. संस्कार भारती, फुलाफुलांच्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या दारापुढे काढल्या गेल्यावर मन प्रसन्न होते.
 
खरे तर पूर्वी घरीच सगळ्यांकडे आकाशकंदील बनवले जायचे. मागच्या काही काळात बाजारात जाऊन निरनिराळ्या आकाराचे, प्रकाराचे कंदील उपलब्ध झाले आहे. मी पहिलीत असताना बाबांनी घरीच आकाशकंदील तयार केलेला. जो पुढची ३-४ वर्षे तरी आम्ही वापरला. मधली काही वर्षे आम्हीही विकतचा आकाशकंदील आणला पण त्यात माहीत नाही का पण मजा वाटत नव्हती. म्हणून चार-पाच वर्षांपूर्वी परत एकदा आई, बाबा आणि मी घरी कंदील तयार केला. बांबूचे षटकोनी आकाराच्या आकाशकंदीलासाठी बाबांनी काठीचे काप करून दिले. पक्क्या दोऱ्याने काड्यांना जोडून षटकोनी साचा तयार झाला. त्यावर रंगीत कागद आणून आईने आणि मी चिकटवले.
 
शेवटी कंदिलाच्या झिरमिळ्या लावून आमचा घरगुती, पर्यावरणपूरक कंदील तयार झाला. पुढची ३ वर्षे फक्त आम्ही षटकोनी साच्यावरील रंगीत कागद बदलत होतो. गेल्यावर्षी माझ्या दादा वहिनीने ठरवले की यंदा आपण बाहेरून विकत आकाशकंदील आणुया. सगळ्यांनी या निर्णयाला एकमताने होकार दिला ही….पण बाजारातले आकाशकंदील आम्हाला पसंतच पडेना…त्यात त्यांच्या किंमतीही आमच्या बजेट बाहेरच्या. यामुळे पुन्हा एकदा आम्ही घरीच कंदील बनवायचा असे ठरवले. पण हा आकाशदिवा टाकावू वस्तुतून असावा म्हणून आम्ही घरातल्या जुन्या विजेच्या वायरला लावणाऱ्या पांढऱ्या केसिंग कॅपिंगचा आयताकृती साचा तयार केला. वहिनीने आणलेले चमकीचे कागद त्यावर नक्षीदार पद्धतीने चिकटवले. गणपती आरासाच्या वेळेस उरलेले कागदाच्या तुकड्यांनी मी आणि दादाने झिरमिळ्या कापून लावल्या. इनमीन दीड-दोनशे रुपयांचा खर्च या आकाशकंदीलासाठी आला पण लाखमोलाचा आनंद आणि समाधानाचा क्षण मात्र देऊन गेला.
 
बऱ्याचदा लोकं आपण पर्यावरण जपले पाहिजे, सण-उत्सव साजरे करताना पर्यावरणाचे भान राखले पाहिजे असे काय काय म्हणत असतात पण हीच लोकं स्वतः त्या दृष्टीने कृती करताना दिसून येत नाही.’लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण ‘ अशी त्यांची गत असते. मात्र याला माझे कुटुंब अगदी अपवाद आहे. शाळा आणि अर्थात आपले कुटुंब आपल्या जडणघडणीच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. याच शाळेतून आणि कुटुंबातून विचारांचा प्रभाव आपल्यावर पडताना दिसतो. सुदैवाने याच जडणघडणीच्या काळात माझ्यावर पर्यावरणपूरक सण-उत्सव साजरे करण्याचा प्रभाव पडला. दिवाळी तर तुम्हा आम्हा सगळ्यांसाठीच आनंदाचे, उत्साहाचे, मांगल्याचे आणि चैतन्याचे क्षण आपल्या पोतडीत जमा करत असते. आमच्यासाठी या सर्व गोष्टींसोबत पर्यावरणाचे भान राखणारे क्षण सुद्धा पोतडीत साठवण करत आहे. वर उल्लेख केलेल्या गोष्टी आमच्या घरी दिवाळीत तर होतच असतात. यापलीकडे जाऊन गणेश उत्सवात स्वतः घडवलेला शाडू माती, तांबड्या मातीचा बाप्पा असेल किंवा रंगपंचमीत घरी तयार केलेले रंग किंवा पुस्तक वसा सारखा उपक्रम. समाधानाने भरलेल्या या आश्वासक चित्रातून पर्यावरण हित जपत केलेला प्रयत्न आणि कुटुंबाचा भक्कम आधारच नव्या बदलाची नांदी आहे असेच वाटते.
 
                                                                                                                                   - अश्विनी विद्या विनय भालेराव 


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121