मुंबई : मध्य रेल्वेवरील वंदे भारत एक्स्प्रेस सेवेला प्रवाशांचा, प्रामुख्याने नोकरदार वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नोकरदार वर्ग सुट्टीच्या दिवशी त्यांच्या कुटुंबियांसोबत सहलीचे नियोजन करतात. यावेळी वंदे भारतने प्रवास करणारे बहुतेक प्रवासी हे १५ ते ३० या तरुण वर्गातील आहेत.
१५ सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर दरम्यान सीएसएमटी ते सोलापूर वंदे भारत असा एकूण ५५,९०५ प्रवाशांनी प्रवास केला. ज्यामध्ये १ ते १४ वर्षे वयोगटातील २,४३८ प्रवासी, १५ ते ३० वयोगटातील १८,७६४ प्रवासी, ३१ ते ४५ वर्षे वयोगटातील १८,०४२ प्रवासी, ४६ ते ६० वर्षे वयोगटातील ११,५२८ प्रवासी आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील ५.१३३ प्रवासी यांचा समावेश होता. यानुसार १५ ते ३० वयोगटातील नोकरदार वर्ग वंदे भारतचा अधिक प्रमाणात वापर करत असल्याचे मध्य रेल्वेच्या अहवालातून समोर आले आहे.
वंदे भारत मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते साईनगर शिर्डी, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते मडगाव आणि नागपूर-बिलासपूर या मार्गावर धावते. ट्रान्सजेंडर प्रवाशांनीही वंदे भारतमधून प्रवास केला असून एकूण प्रवाशांपैकी ४.५ टक्के प्रवासी या श्रेणीतील आहेत. यासोबतच वंदे भारत सुरू झाल्यापासून विमान प्रवासात १० ते २० टक्के घट झाली आहे. त्यामुळे हवाई भाडे २० ते ३० टक्क्यांनी कमी झाले आहे.