मुंबई : पावसाची आता निरोप घेण्केयाची वेळ आली तरी वडाळा पूर्व, दीनबंधू नगर आणि संगम नगर यांना जोडणारा नाला हा अजूनही साफ न झाल्याचे आणि मागील १५ ते २० वर्षे या नाल्याची संपूर्ण सफाई न झाल्याचे येथील स्थानिकांनी "दै. मुंबई तरुण भारत" सोबत बोलताना स्पष्ट केले. "आम्ही नगरसेवकांना अनेकदा नाला साफ करण्याविषयी सांगूनही स्थानिक प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची पावले उचलण्यात आली नाहीत. लोकप्रतिनिधी हे फक्त निवडणुकांपुरतेच आश्वासन देतात पण ती आश्वासने अंमलात आणत नाहीत," अशी तक्रार येथील स्थानिकांनी केली आहे.
तसेच पावसाळ्यात अनेकदा तुंबलेल्या नाल्यामुळे सर्व दूषित पाणी हे आमच्या घरात येत असल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागत असून त्यामुळे अनेकदा आमच्या कुटुंबातील लोक आजारी देखील पडतात हा नाला पूर्णपणे धोकादायक परिस्थितीमध्ये असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून लहान मुले खेळात असता अनेकदा त्या नाल्यापाशी गेल्याने दुर्घटना देखील घडल्याचे नागरिकांनी सांगितले.
साधारण १ लाख वस्त्यांतील दूषित पाणी हे या नाल्याचतच येत असल्याने येथील नागरिकांना आरोग्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तसेच लोकप्रतिनिधींकडून या संदर्भात कोणतीच पावले उचलण्यात येत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. तसेच लवकरात लवकर या नाल्याची साफ सफाई करण्यात यावी अशी विनंतीही येथील नागरिकांनी केली आहे.
- शेफाली ढवण