मुंबई : श्रीरामपूर तालुक्यात महिन्याभरापूर्वी मुस्लिम मुलीशी विवाह करणाऱ्या तरुण दीपक बर्डेची हत्या केल्याची कबुली अटकेत असलेल्या आरोपींनी पोलिसांना दिली आहे. बर्डे लग्नानंतर अचानक बेपत्ता झाला होता, त्याचा घातपात करण्यात आल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला. कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संशयितांना अटक केली होती. आरोपींनी दिलेल्या कबुली जबाबानुसार बेपत्ता तरुणाची हत्या झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. परंतु, बर्डे यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.
नेमकं प्रकरण काय?
श्रीरामपूर तालुक्यातील भोकरमध्ये राहणारा दीपक बर्डे या तरुणाचं शहरातील एका मुस्लिम मुलीशी प्रेमसंबंध जुळले होते. मात्र त्यांच्या या नात्याला दोघांच्याही कुटुंबियांचा विरोध होता. मात्र दोघांनीही घरच्यांचा विरोध झुगारून महिनाभरापूर्वी लग्न केलं होतं. विवाह करून मुलीला घरी आणल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी दीपकला मारहाण करत मुलीला परत घरी नेलं होतं.
लग्न केल्यानंतर पत्नी तिच्या मामाच्या घरी असल्याचं कळताच दीपकनं नोकरी शोधण्यासाठी बाहेर जात असल्याचं सांगत पुणे गाठलं. परंतु तो अद्याप घरी परतलेला नाही. त्यामुळं आता त्याच्या घरच्यांच्या चिंता वाढल्या असून त्यांनी श्रीरामपूर पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली आहे. याशिवाय दीपक कुठे गेला, त्याच्यासोबत काय झालंय, सध्या तो कुठे आहे?, याबाबतची माहिती अजून समोर आलेली नाही. दीपकच्या वडिलांना त्याचा घातपात करण्यात आल्याचं संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनीही तातडीनं कारवाई करत चार संशयितांना अटक केली आहे.