शरद पवार कायमच आपला मराठी बाणा आणि अभिमान दाखवत असतात. आपण कायम धर्मनिरपेक्ष कसे आहोत हे दाखवत ते फिरत असतात. ही एवढी सगळी मेहनत करून सुद्धा त्यांचे खरं प्रेम कुणावर आहे हे दिसून येतं. आणि कधीकधी असं पोटातलं ओठावर आल्याशिवाय राहत नाही. वरून कितीही धर्मनिरपेक्ष असले तरी ते आतून फक्त आणि फक्त विशिष्ट मतांसाठी लांगूलचालन करण्याचा प्रयत्न पवारांची राष्ट्रवादी का करते याचं उत्तर त्यांच्याच पक्षाच्या मंचावरुन पहायला मिळतं.
नुकतचं राष्ट्रवादी काँग्रेसचे पार पडलेल्या आठव्या राष्ट्रीय अधिवेशनात पवारांच्या स्वागतासाठी जोधा अकबर चित्रपटातील अझीमो शान शेहेनशाह हे अकबर बादशहाच्या स्तुतीचे गाणे वाजवले गेले. या अधिवेशनात मात्र भाषण करताना शरद पवारांनी नेहमी प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज तसेच इतर महापुरुषांचे उल्लेख केले. याच भाषणात पवार इतिहासात गेले. शिवाजी महाराज कसे दिल्लीच्या बादशाहासमोर झुकले नाहीत, महाराजांनी शक्तिशाली औरंगजेबाला कसे कायम झुकवले याचे वर्णन करत लोकशाही मार्गानं निवडून आलेल्या मोदी सरकारला लक्ष्य केलं.
राष्ट्रवादीचे अधिवेशन दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर होत होते. ही तीच इतिहास प्रसिद्ध जागा आहे जिथे मराठयांचे रणधुरंदर सेनापती पेशवे बाजीराव साहेब यांच्या प्रसिद्ध दिल्ली स्वारीत त्यांचा तळ पडला होता. याही घटनेचा उल्लेख करून बाजीरावांनी दिल्लीच्या बादशहीला कसा तडाखा दिला. हेही अभिमानाने सांगितले. तसाच महाराष्ट्र हा दिल्लीसमोर कधीच कसा झुकला नाही आणि यापुढेही झुकणार नाही असे ठासुन सांगितले.
एवढी सगळी जोरदार भाषणबाजी केली तरी पवारांचे राजकारण बघितले तर पवार सपशेल खोटं बोलत आहेत हे लगेच दिसतं. शरद पवार कायमच संधीसाधू पणा करत आले. शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्रातील मराठा जातीचा वारंवार उल्लेख करायचा पण याच महाराजांच्या महाराष्ट्रातील शेकडो निष्पाप नागरिक मारणाऱ्या इस्लामी दहशतवादी दाऊद इब्राहिमचे साथीदार असलेल्या नवाब मालिकांना मंत्रिपदावर बसवायचे हा उरफाटा खेळ पवारांचाच. तिकडे एमआयएम सारखा पक्ष क्रूरकर्मा औरंगजेबाचे उदात्तीकरण करत असताना नुसतं बघत राहायचे आणि प्रचंड कष्ट करून, अत्यंत श्रद्धेने शिवचरित्राचे लेखन केलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर अत्यंत घाणेरडे आरोप करायचे हे पवारांचेच राजकारण. स्वतःच्या स्वार्थासाठी खोटा इतिहास सांगणाऱ्या ब्रिगेडींना जवळ करायचे आणि त्याचवेळी दहशतवादी याकूब मेमन याच्या कबरीचे सुशोभीकरण करायचे हे सगळे पवारांचेच हिरवे राजकारण.
त्यावर स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेत मतदारांच्या डोळ्यात धूळ फेकायची. छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्र, किंवा अन्य कुठलेही गीत न वाजवता त्यांनी दिल्लीकर बादशहाचे गुणगान गाणारे गीतच राष्ट्रवादीच्या मेळाव्यात का वाजवले जाते याचं उत्तर एव्हाना कळलंचं असेल. दिल्लीचं सत्ताधीशांच्या समोर झुकून झुकून सत्ता मिळवायची आणि चूल पेटती ठेवायची हाच खेळ पवारांनी आजपर्यंत केला आहे. यापुढेही करतच राहतील. मात्र यातून महाराष्ट्राचे, मराठी माणसाचे नुकसानच होत राहील. पवारांची ही फोडा आणि झोडा ही नीती आता महाराष्ट्र पुरता ओळखून आहे. हे मात्र नक्की.
- हर्षद वैद्य