मुंबई (ओंकार मुळ्ये) : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील नवा भारत विकासाच्या दिशेने चांगलीच भरारी घेत आहे. सध्याचे केंद्रशासीत प्रदेश असलेले जम्मू-काश्मीरसुध्दा यात उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली अग्रस्थानी येऊ लागले आहे. मात्र आजही याठिकाणी रोजगाराशी संबंधित अनेक गोष्टींच्या उपलब्धतेत पुरेशी वाढ न झाल्याने इथली मुले काश्मीरमधून बाहेर पडत आहेत आणि मुंबई सारख्या अनेक शहरात उच्च शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी शनिवार, दि. १० सप्टेंबर रोजी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, वडाळा येथे गुलशन फाऊंडेशन, मुंबई; फाऊंडेशन फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट (FHD), नवी दिल्ली आणि पॉलिसी अॅड्वोकेसी रिसर्च सेंटर (PARC), मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 'मेरे सपनों का जम्मू-काश्मीर' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जम्मू-काश्मीरच्या विकासाबाबत विद्यार्थ्यांच्या विचारांची देवाण-घेवाण, असा संवादात्मक कार्यक्रम यावेळी पार पडला.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा, पुंछ, बारामुला, कुपवाडा यांसारख्या भागातले विद्यार्थी आयसीटी मुंबई, मुंबई विद्यापीठ याठिकाणी त्यांच्या आवडीचे शिक्षण घेत आहेत. आपण शिकलेल्या गोष्टींचा उपयोग आपल्या जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी तसेच रोजगार उपलब्धतेसाठी करावा, असे या विद्यार्थ्यांचे स्वप्न आहे. अशा मुलांना एकत्र घेऊन गुलशन फाऊंडेशन, एफएचडी आणि पार्क या संस्था ग्राऊंड झिरोवर उतरून मुंबई आणि जम्मू-काश्मीरसारख्या भागात काम करत आहे. इथल्या विद्यार्थ्यांशी संपर्क ठेवणे, त्यांच्या पालकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चांगला संबंध वाढवणे तसेच जम्मू-काश्मीरचा भविष्यातील विकास, रोजगाराची संधी यांसारख्या गोष्टी तिथल्या लोकांपर्यंत पोहोचवणे, या गोष्टी या उपक्रमाअंतर्गत होत आल्या आहेत. पार्क ही संस्थासुध्दा गेले वर्षभर जम्मू-काश्मीरमध्ये संशोधनात्मक पद्धतीने काम करत आहे.
प्रधानमंत्री विशेष शिष्यवृत्ती योजनेद्वारे (PM-SSS) २०१४ पासून जम्मू-काश्मीरहून आलेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांचा या संकल्पनेशी संबंध आला. २०१६ नंतर यास उत्तम प्रतिसाद मिळाल्याने ही मुलं आता उपक्रमात स्वयंसेवक म्हणून स्वतः काम पाहू लागली आहेत. जम्मू-काश्मीमध्ये रोजगाराच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने अनेक लोकं उद्योगधंद्यावाचून वंचित आहेत. याकारणास्तव जम्मू-काश्मीरमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांत उत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा निर्धार या जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्यांनी घेतला आहे.
या कार्यक्रमादरम्यान गुलशन फाऊंडेशन मुंबईचे सचिव इरफान अली पीरजादे, एफएचडीच्या सल्लागार समिती अध्यक्ष (सी.ए.) शीतल वैद्य देशपांडे, अफ्रोज फाऊंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक सईद सुहील, पार्क संस्थेचे संस्थापक आणि संचालक दिलीप करंबेळकर, पार्क संस्थेच्या जम्मू-काश्मीर क्षेत्र विकास प्रमुख रुचिता राणे आणि इतर मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.
भारतातील कुठलेही राज्य हे त्या राज्यातील लोकांच्या माध्यमातूनच विकसित होऊ शकते. तिथल्याच लोकांच्या सहाय्याने एक चांगले औद्योगिक क्षेत्र त्याठिकाणी निर्माण होऊ शकते. जम्मू-काश्मीरचे उदाहरण पाहता आज याठिकाणी रोजगार, उद्योग यांसारख्या गोष्टींची कमतरता आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरहून मुंबईत शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्याच शिक्षणात प्रगत केलं तर ते काश्मीरमध्ये हीच कमतरता दूर करून स्वतः रोजगार उपलब्ध करून देण्यास तयार होतील.
- इरफान अली पीरजादे, सचिव, गुलशन फाऊंडेशन मुंबई
जम्मू काश्मीरचं भविष्य ज्या तरुण मुलांच्या हातात आहे, त्या मुलांच्या भविष्याला आणि हाताला बळकटी देण्यासाठी फाऊंडेशन फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट (FHD) सातत्याने सहा ते सात वर्ष ग्राऊंड झिरोवर उतरून काम करत आहे. ही मुलं वेगवेगळ्या मानसिकतेतून आलेली असतात. त्यामुळे शिक्षणातून समृद्धीकडे जाण्यासाठी मातृत्व भावनेने कामाची सुरुवात झाली आणि आज यात बरीच प्रगती होताना दिसत आहे.
- शीतल देशपांडे (सी.ए.), अध्यक्ष, एफएचडी सल्लागार समिती
जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्याना काश्मीरबाहेर जाऊन शिक्षणाची संधी मिळाल्यामुळे त्यांना घडलेल्या विकासातून नवा अनूभव मिळत आहे. त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून त्यांनी जी प्रगती पाहिली व अनुभवली आहे, ती जम्मू-काश्मीरच्या विकास प्रक्रियेमध्ये नवी दिशा देईल. नवी गती देईल. या प्रक्रियेचे नेतृत्व हे विद्यार्थी करतील, असा मला विश्वास आहे.
- दिलीप करंबेळकर, संस्थापक आणि संचालक, पार्क
जम्मू-काश्मीरमधली मुलं सुशिक्षित असली किंवा ते चांगल्या दर्जाचे शिक्षण घेत असले तरी रोजगाराची कमतरता आजही त्याठिकाणी भासते. त्यामुळे अशावेळी ग्राऊंड झिरोवर उतरून विद्यार्थ्यांशी बोलून त्यांचे विचार जाणून घेण्याची गरज आहे. त्यावर मार्गकाढून आपण त्यांना निरनिराळ्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो. अशाने हीच मुलं पुढे त्यांच्या क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देण्यात पुढाकार घेऊ शकतील आणि असे विद्यार्थी रोजगाराच्या दृष्टीने विकसित जम्मू-काश्मीर नक्कीच घडवण्यात यशस्वी ठरतील.
- रुचिता राणे, जम्मू-काश्मीक क्षेत्र विकास प्रमुख, पार्क