ठाणे : अभिनय क्षेत्राला अंत नाही, जेवढे कराल तेवढे कमी आहे. शिक्षण घेऊन अभिनय येतो, यावर माझा तितकासा विश्वास नाही. अन्यथा, शिक्षण घेणारे सगळेच आज टॉपचे अभिनेते झाले असते. तेव्हा, अभिनय कसा करावा हे दाखविण्यासाठी अभिनय कला उपजत असावी लागते. असे प्रांजळ मत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केले.
मराठी ग्रंथ संगहालय, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर प्रतिष्ठान, ठाणे आणि ग्रंथाली प्रकाशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने अशोक सराफ यांचा सोमवारी ठाण्यात जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या नाट्य, चित्रपट, मालिका व लेखन प्रवासाचा लेखाजोखा 'अशोक एक बहुरुपी' या कार्यक्रमातून उलगडला. अभिनेते विघ्नेश जोशी यांनी त्यांना बोलते केले. याप्रसंगी, ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर, केदार बापट आदी उपस्थित होते.
१९६७ मध्ये ययाती देवयानी या नाटकापासून रंगभूमीवर पदार्पण झाले. मात्र, वयाच्या सहाव्या - सातव्या वर्षी मी एका एकांकिकेत अभिनय केला होता. तेव्हा मला सर्वोकृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला. तेव्हापासून आपण चांगला अभिनय केला तर पुरस्कार मिळतात हे मला उमगले. त्यातून मी कायम पुरस्कार मिळालाच पाहिजे, या ईर्ष्येने काम करत गेल्याचे अशोक सराफ यांनी सांगितले. माझ्या मामांची कलामंदिर ही संगीत नाटकाची कंपनी होती. त्यामुळे, बऱ्याच दिग्ग्ज कलावंतांचा अभिनय बघण्याची संधी लाभली. अभिनय करताना चेहर्यावरील हावभाव महत्वाचे असुन त्यात वैविध्य दाखवता आले पाहिजे. मराठी प्रेक्षकाला विनोद हा चांगलाच कळतो. त्या विनोदातील खाचा त्याला समजत असतात. म्हणूनच मराठीतील विनोद हे अधिक प्रगल्भ आहेत असेही ते म्हणाले.
नाटकाची तालिम सुरू असताना मला कोणीही हसलेले आवडत नाही. ज्यावेळी नट हसतो त्यावेळी तो त्याच्या भूमिकेतून, कलेतून बाहेर पडतो. नाटक करताना नाटकावरच निष्ठा हवी किंबहुना, केवळ नाटकाचाच विचार असावा. असे मत व्यक्त करून आजही मी नाटकाला एक तास आधी पोहोचतो. नाटकाचा एकदा सूर लागला की, नाटक रंगते. असे सांगुन सराफ यांनी विविध किस्से, आठवणीचा खजिना उघडुन आपली तबला वादनाची कलाही रसिकांसमोर उलगडली.