मुंबई : राज्यात गेल्या आठवड्यपासून सुरु असलेला मुसळधार पाऊस अजुणही काही दिवस तसाच चालू राहण्याचा हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात मंगळवारीही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून कोकणासह पुणे, नाशिक, कोल्हापूर, गडचिरोली, या जिल्ह्यांनाही हवामान खात्याकडून रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
कोकणातील जगबुडी,कुंडलिका या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. चिपळूण शहरातून वाहणाऱ्या वाशिष्टी नदीही दुथडी भरून वाहत असल्याने चिपळूण तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातही पूरस्थिती निर्माण झाली असून ३८७ गावांना पुराचा वेढा पडला आहे.कर्नाटकच्या अलमट्टी धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून आता ७५ हजार क्युसेक इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग होतो आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीला अलमट्टी धरणातील विसर्ग महत्वाचा असतो.