पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबीयांसह रविवारी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भल्या पहाटे आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा केली आणि राज्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रार्थना केली.मुख्यमंत्र्यांसमवेत यंदा महापूजेचा मान बीड जिल्ह्यातील गेवराई तालक्यातील रुई गावचे वारकरी दाम्पत्य मुरली भगवान नवले आणि जिजाबाई मुरली नवले याना मिळाला. हे दाम्पत्य गेले २० वर्षे पंढरीची वारी करत आहे.महापूजेच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे हेसुद्धा उपस्थित होते. मुख्यमंत्री शनिवारी पुणे येथून पंढरपूरकडे रवाना झाले. तेथे शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या कार्यक्रमाचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली.त्यानंतर मुख्यमंत्रीपहाटे साडेपाच वाजता विठ्ठल मंदिर परिसरातील इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमिपूजन, पावणेसहा वाजता नदी घाटाचे लोकार्पण,तसेच सोलापूर जिल्ह्यातील ‘सुंदर माझे कार्यालय’ या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा, पंचायत समितीतील स्वच्छता दिंडीत सहभाग, आणि पक्ष मेळाव्यास उपस्थिती राहून सोलापूर येथून मुंबईकडे रवाना होतील.सायंकाळी साडेचार वाजता मुंबई विमानतळ येथे मुख्यमंत्र्यांचे आगमन होईल. त्यानंतर ते ठाण्यातील निवासस्थानासाठी रवाना होणार आहेत.