मुंबई : राज्यसभेनंतर आता विधानपरिषदेच्या निवडणूक येत्या २० जून रोजी होणार आहेत. भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली. तीन पक्ष एकत्र आल्याने बहुमताचा आकडा सहज पार झाला. पण, समाजवादी, स्वाभिमानी शेतकरी, शेकाप, प्रहार जनशक्ती, क्रांतिकारी शेतकरी पक्ष यांच्यासह अनेक घटकपक्ष त्यांच्यासोबत गेले. अडीच वर्षात या आमदारांकडे प्रमुख तीन पक्षांच्या नेत्यांनी लक्ष्य दिले नाही. बहुमतासाठी त्यांच्या मताची फारशी गरज नसल्याने या नेत्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि याचा फटका राज्यसभा निवडणुकीत माविआला बसला.
"अडीच वर्षात अपक्षांकडे केलेले दुर्लक्ष विधान परिषद निवडणुकीत डोकेदुखी वाढवणार असल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते अस्वस्थ झाले आहेत म्हणे. अपक्ष आमदारांकडेच कशाला? राज्यातल्या १३ कोटी जनतेकडे ही गेली अडीच वर्षे दुर्लक्षच केले आहे. याला म्हणतात सत्तेची मस्ती." असे म्हणत आ.अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.