मुंबई : सध्या राज्यात अनेक कारणांवरून राजकारण तापलेले आपल्याला पहायला मिळत आहे. 'आपण सर्वकाही जनतेसाठी करतो', असे सातत्याने म्हणणाऱ्या शिवसेनेच्या स्वतःच्या आमदारांच्या मतदारसंघात जनतेला साध्या रस्त्यासाठी फरफट करावी लागत असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात भाजप नेत्या चित्रा वाघ आमदार भास्कर जाधव यांच्या मतदारसंघातून ट्विट करत एक व्हिडिओ शेअर केला आहे.
"ओ भास्कर जाधव शेठ…लोकांना ज्ञान देत फिरतां जरा मतदारसंघात लक्ष द्या. मिर्ले गावात मुलांना शाळेत जायचय पण तुमच्याकडे वारंवार मागणी करून..सरपंच ते खासदार सगळे तुमचेच असतांनाही झोलाईदेवी-धनगरवाडी रस्ता अद्याप नाही. आदित्य ठाकरे जी तुम्हीचं पुढाकार घेत या चिमुकल्यांना न्याय द्या," अशा शब्दात चित्रा वाघ यांनी भास्कर जाधवांना टोला लगावला आहे.
तसेच "हा रस्ता बनवण्यात यावा यासाठी वारंवार मागणी करण्यात आलेली आहे. हा रस्ता जिल्हा परिषदेच्या मालकीचा आहे. स्थानिक आमदार भास्करराव जाधव यांना त्यांच्या या मतदारसंघात पडलेला अंधार दिसत नाही का? जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण तर तुमचाच मुलगा. मुंबईत तोंडाची वाफ घालवण्यापेक्षा तो सर्व जोर तुमच्या ग्रामविकासमंत्र्यांकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे लावून निधी आणा," असेही चित्रा वाघ यांनी व्हिडिओमधून म्हटले आहे. तसेच तुमचे आमदार तर काही काम करत नाहीत तेव्हा तुम्ही तरी काहीतरी काम करून द्याल, या प्रतीक्षेत येथील लहान मुले आहेत," असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी एकदा या मिर्ले गावाला भेट द्यावी असे आवाहन चित्रा वाघ यांनी केले आहे.