पुणे : राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते, जे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अतिशय जवळचे मानले जातात, त्या अनिल परब यांच्या सात ठिकाणांवर त्यांनी केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरूवारी पहाटे ६.३० वाजल्यापासून धाडसत्र सुरू केले. यात पुणे येथील दोन घरांवर देखील धाड टाकून ‘ईडी’ने तपास सुरू केला.
दापोली येथे बेकायदेशीर रिसॉर्ट बांधकाम प्रकरणी ही ‘ईडी’ची कारवाई सुरू आहे. येथील कोथरूड परिसरात राहत असलेले रहिवासी विभास साठे यांनी त्यांची दापोली येथील जागा अनिल परब यांना विकली होती. हा व्यवहार एक कोटी, दहा लाख रुपयांचा झाला होता. याच व्यवहाराचा तपास करण्यासाठी हे पथक पुण्यात येऊन धडकले आहे. येथील ‘इंद्रधनू’ नावाच्या सोसायटीतील त्यांच्या जुन्या घरी आणि ‘द पॅलेडियम’ या इमारतीत ही तपासणी पहाटेपासून सुरू होती.
बेकायदेशीररित्या रिसॉर्ट बांधले
२०१७ मध्ये परब आणि साठे यांच्यात हा जमिनीचा व्यवहार झाला होता. परब यांनी दापोलीत असलेली साठे यांची ४२ गुंठे जमीन विकत घेतली होती. त्यानंतर आपण या जागेच्या कोणत्याही व्यवहारात नसल्याचे साठे यांनी या अगोदरच स्पष्ट केले आहे. त्यामुळे साठे यांच्या नावाने बनावट स्वाक्षर्या करून परब यांनी पुढे त्या जागेवर बेकायदेशीररित्या रिसॉर्ट बांधले, ही माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनीदेखील माध्यमांना दिली होती. विशेष म्हणजे, साठे यांचे हे स्पष्टीकरण असलेले पत्रच सोमय्या यांनी सादर केले होते. त्यामुळे ही जमीन खरेदी केल्यावर परब यांनी बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी हा तपास आता ‘ईडी’ने सुरू केला आहे.
याच तपासाचा भाग म्हणून पुण्यातील या दोन घरांवर ही तपासमोहीम सुरू असल्याचे समजते. तथापि, या तपासात काय आढळले, याची कोणतीही माहिती प्राप्त झाली नाही. मात्र, राज्यातील आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे कारनामे पुण्यापर्यंत येऊन धडकले, ही बाब यानिमित्ताने अधोरेखित झाली. उल्लेखनीय म्हणजे, किरीट सोमय्या यांनी परवा येथील पत्रकार परिषदेत “अनिल परब प्रकरणाचा आपण पाठपुरावा करीत असल्याचे सांगून त्यांच्यावर कारवाई होईल,” असा विश्वास व्यक्त केला होता.
कलमाडी भ्रष्टाचाराच्या आठवणी जाग्या
पुणे हे तसे सुसंस्कृत शहर म्हणून परिचित आहे. त्यामुळे येथे कोणतीही अनैतिक अथवा भ्रष्टाचाराची घटना घडली की, येथील सुजाण लोक त्या व्यक्तीला त्याची योग्य जागा दाखवून देतात. शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्या भ्रष्टाचार प्रकरणातील आजच्या धाडीच्या पार्श्वभूमीवर पुणेकर सुजाण नागरिक सुरेश कलमाडी यांच्या भ्रष्टाचार प्रकरणांना उजाळा देत होता. २०१०च्या दिल्ली ‘राष्ट्रकुल खेळा’तील भ्रष्टाचार प्रकरणी ‘सीबीआय’ तपासानंतर तेव्हाचे काँग्रेस नेते सुरेश कलमाडी व इतर ११ जणांवर २०१२ मध्ये आरोप निश्चित करण्यात आले होते. आता अनिल परब त्या रांगेत आहेत, असे सुज्ञ पुणेकरांना वाटते.