सावरकरच ‘स्वातंत्र्यवीर` का?

    27-May-2022
Total Views | 125

savarkar 6
 
 
 
  
 
आपल्याला अनेक वेळा प्रश्न पडतो, स्वातंत्र्यवीर अनेक आहेत. परंतु, विनायक दामोदर सावरकर यांनाच ‘स्वातंत्र्यवीर` असे वैशिष्ट्याने का म्हटले जाते? आजच्या लेखात त्याविषयीचे केलेले हे सविस्तर विवेचन...
 
 
 
सावरकरांचा जन्म लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काय केले पाहिजे, हे सांगत असतानाच झाला. त्यांच्या आईची कुशीच मुळी स्वातंत्र्य मागत होती. त्यांचे मोठे भाऊ बाबाराव, लहान भाऊ नारायणराव हेदेखील स्वातंत्र्यसंग्रामात सक्रियपणे कार्यरत होते. अख्खे घर जर स्वातंत्र्यदेवतेला ‘मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा` या भावनेने सर्वस्वाचे दान देत असेल, तर सावरकर स्वातंत्र्यवीर होते ना! वयाच्या सोळाव्या वर्षी चापेकर बंधूंच्या बलिदानानंतर स्वातंत्र्यलक्ष्मीची प्रतिमा स्वत:च्या घरच्या शस्त्रधारी दुर्गेत सावरकर बघतात आणि प्रतिज्ञा करतात- “मी माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सतत झगडत राहीन आणि चापेकरांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्णत्वास नेईन. त्यासाठी माझ्या सर्वस्वाची आहुती देईन. ब्रिटिशांना माझ्या मातृभूमीतून हुसकावून लावेन आणि स्वातंत्र्य मिळवून देईन,” लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा सावरकर अक्षरशः जगले. म्हणूनच ते ‘स्वातंत्र्यवीर` ठरतात. यासाठी आपण त्यांच्या आयुष्यातील दाखले समजून घेऊ.
 
 
 
सावरकरांनी लिहिलेले पोवाडे, फटके सारखी काव्ये यांनी वातावरण भारून गेले होते. उत्साही मुलांमध्ये स्वातंत्र्याचे विचार पसरवून सावरकरांनी स्वातंत्र्यप्राप्तीचे मार्गात तरुणाई आणली, असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. पुणे येथे ‘फर्ग्युसन कॉलेज`मध्ये शिकत असताना त्यांनी सावरकर गट स्थापन केला. ‘आर्यन-वीकली` हे साप्ताहिक सुरू केले. त्यातूनच वाङ्मय, देशभक्ती, इतिहास, विज्ञान या विविध विषयांच्या माध्यमातून स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. `सप्तपदी` या लेखात परतंत्र राष्ट्रास उत्क्रांती करून घेताना कोणत्या सात टप्प्यांतून जावे लागते, हे त्यांनी नमूद केले. यावरून त्यांचा किती खोलवर अभ्यास होता, हे दिसून येते. १९०५ साली बंगालच्या फाळणीमुळे राष्ट्रवाद प्रचंड प्रमाणात वाढला. संपूर्ण भारत एक झाला. सावरकरांनी यावेळी स्वदेशीचा वापर व परदेशी मालावर बहिष्कार या गोष्टींचा प्रचार केला. दि. ७ ऑक्टोबर, १९०५ रोजी पुण्यात परदेशी कापडांची होळी झाली. या काळात केलेल्या सावरकरांच्या आवेशपूर्ण भाषणाचा परिणाम जनमानसात दीर्घकाळपर्यंत राहिला. यासाठी ‘फर्ग्युसन`चे प्राचार्य र. पु. परांजपे यांनी सावरकरांना दहा रुपये दंड केला आणि वसतिगृहातून त्यांना काढून टाकले. भारतात परदेशी कपड्यांची होळी करणारा आद्य भारतीय नेता म्हणजे सावरकर होय. राजकीय कारणांसाठी शिक्षणसंस्थेतून हकालपट्टी झालेला पहिला भारतीय हाही सावरकरच होय!
 
 
 
त्याच काळात १९०६ मध्ये पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या शिष्यवृत्तीमुळे लंडन येथे शिकण्यासाठी सावरकरांना संधी आली. ‘अभिनव भारत`चे नेतृत्व करणाऱ्या सावरकरांनी लंडन येथे क्रांतिकारी कल्पनांचा प्रसार सुरू केला. मॅझिनी यांच्या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद केला. या ग्रंथाची पहिली आवृत्ती तीन महिन्यांत संपली. ‘राष्ट्रवादाचा धडा देणारे पाठ्यपुस्तक` असा याचा उल्लेख केला गेला. या ग्रंथावर जप्ती आली. परंतु, याची २६ पानी स्फूर्तिदायक प्रस्तावना देशभक्तांना तोंडपाठ होती. लंडन येथील वास्तव्यात सावरकरांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचे मत मांडण्यास सुरुवात केली. सावरकरांनी न्यूयॉर्कच्या `गॅलिक अमेरिका` या नियतकालिकात भारतीय स्वातंत्र्यासाठीचे लेख प्रसिद्ध केले. त्याचा जर्मन, फ्रेंच, इटालियन, रशियन भाषांमध्ये अनुवाद केला गेला. ते त्या-त्या राष्ट्रांत प्रसिद्ध केले गेले. अशाप्रकारे संपूर्ण जगाला भारतीय स्वातंत्र्यलढ्याची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय प्रश्न धगधगता ठेवला. १८५७चे बंड हे बंड नसून स्वातंत्र्यसमर होते, सर्वात जास्त ब्रिटिशांची हानी त्यात कशी झाली, ते कसे देशव्यापी युद्ध होते, यावर सावरकरांनी '१८५७चे स्वातंत्र्यसमर` हा बहुचर्चित ग्रंथ लिहिला. हे एकमेव असे ऐतिहासिक पुस्तक आहे, ज्याला प्रकाशनपूर्व प्रतिबंध घातला गेला. तरीही अनेक देशांत, अनेक भाषांत हे पुस्तक पोहोचले. त्यामुळे साऱ्या जगाला भारताच्या सामाजिक, राजकीय स्थितीची जाणीव झाली.
 
 
 
दि. ८ जुलै, १९१० रोजी मार्सेलिस येथे मारलेली ऐतिहासिक उडी त्यांच्या स्वातंत्र्यप्रेमाचा परमोच्च क्षण होता. ही केवळ सामान्य उडी नव्हती, तर विश्वाच्या राजकारणात भारताच्या स्वातंत्र्याविषयी केलेली गर्जना होती. `कृतीतून प्रचार` हा मोठा संदेश यातून जगाला मिळाला. ब्रिटिशांविरुद्ध जगाचे मत तयार करण्यात त्यांना यश मिळाले. हे प्रकरण दडपण्यासाठी इंग्रजांना खूप प्रयत्न करावे लागले. साऱ्या जगाचे लक्ष भारताकडे वळवून घेण्यात सावरकर या कृतीने यशस्वी झाले. या सर्वाचा परिपाक म्हणून सावरकरांची सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली व दोन जन्मठेपेची शिक्षा त्यांना देण्यात आली. सावरकरांच्या सुटकेसाठी जागतिक स्तरावर प्रयत्न झाले. हा सावरकरांचा अभियोग जगाच्या इतिहासात अभूतपूर्व ठरला. व्यक्तिगत दृष्टीने, राष्ट्रीय दृष्टीने, आंतरराष्ट्रीय दृष्टीने सावरकरांनी ब्रिटिश साम्राज्यावर प्रहार केला होता. तो अत्यंत प्रखर होता. स्वातंत्र्याविषयीच्या भारताच्या भावना अत्यंत प्रभावीपणे सावरकर जगभर पोहोचवण्यासाठी यशस्वी झाले असेच म्हणावे लागेल. अंदमान येथे शिक्षा भोगत असताना त्यांची ‘बीए`ची पदवीदेखील काढून घेतली गेली. अंदमानमध्येसुद्धा राजकीय बंदिवानांचे अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. अंदमानमध्ये त्यांनी शैक्षणिक चळवळ सुरू केली. जेथे कागदाचा कपटादेखील दिसत नसे, तेथे सावरकरांच्या प्रयत्नाने ग्रंथालय सुरू झाले. सावरकरांनी तेथील निरक्षर बंदिवानांना साक्षर केले. ग्रंथालयात दोन हजार पुस्तकांचा संग्रह झाला. यावरून सावरकरांच्या कामाचा आवाका आपल्या लक्षात येईल. शिक्षणाशिवाय स्वातंत्र्याचा अर्थ कळत नाही, म्हणून कारावासातही त्यांनी त्यांचे काम सोडले नाही. लोकांच्या मनात स्वातंत्र्याविषयी भावना निर्माण करण्याचे काम त्यांनी तेथेही सोडले नाही. विविधतेतून एकता हा भारताला एकत्र जोडणारा सूक्ष्म धागा सावरकरांनी दिला.
 
 
 
पुढे रत्नागिरी येथे स्थानबद्धतेत सावरकरांनी सामाजिक स्वातंत्र्याचा ध्यास घेतला. ‘धर्मातील अंधश्रद्धा दूर करून हिंदूराष्ट्रात राहणारे ते हिंदू` अशी सर्वसमावेशक हिंदूची व्याख्या करून टाकली. धार्मिक तत्वावर हिंदू धर्म न ठेवता, वैज्ञानिक तत्त्वांवर मांडला जावा, असा विचार पुढे आणला. संपूर्ण भारत ‘हिंदू` शब्दाने एकत्र बांधला जावा, असा विचार करणारा हा द्रष्टा नेता होता.
 
 
 
या सर्वाचा परिपाक शेवटी असा होतो की, सावरकर हेच स्वातंत्र्यवीर आहेत. कारण,
 
१) ब्रिटिश अनुदानित वसतिगृहातून काढून टाकलेले सावरकर हे पहिले भारतीय विद्यार्थी. २) परदेशी कपड्यांची होळी करून स्वदेशीचा प्रचार करणारे पहिले भारतीय. ३) संपूर्ण राजकीय स्वातंत्र्य हे भारताचे उद्दिष्ट प्रकटपणे उद्घोषित करणारे पहिले भारतीय नेते सावरकर. ४) राजकीय विचारसरणी व्यक्त करण्याने ‘बॅरिस्टर` पदवी देण्यास नाकारले गेलेले पहिले भारतीय बॅरिस्टर सावरकर. ५) देशभक्ती दाखवली म्हणून पदवी काढून घेण्यात आलेले पहिले भारतीय पदवीधर सावरकरच. ६) भारतीय स्वातंत्र्याच्या प्रश्नाला आंतरराष्ट्रीय महत्त्व मिळवून देणारे पहिले भारतीय नेते सावरकरच. ७) स्वातंत्र्याविषयीचा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त करून प्रकाशनास परवानगी नाकारले गेलेले असे जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवणारे पहिले ग्रंथकार सावरकरच. ८) ब्रिटिश न्यायालयाचा अधिकार अमान्य करणारे पहिले बंडखोर स्वातंत्र्यवीर सावरकर. ९) हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात ज्यांच्या अटकेवरून रण माजले, ते सावरकर जगाच्या इतिहासातील पहिले राजकीय बंदिवान होत.
 
 
 
कोणत्याही मनुष्याच्या श्रेष्ठत्वाचे मोजमाप करताना त्या कार्याकरिता त्याने किती मूल्य दिले, यावरून करावे. सावरकरांनी सोळाव्या वर्षी मनात स्वातंत्र्यदेवीची स्थापना केली. त्यांनी त्यांचे सर्वस्व म्हणजे प्रेम, लेखणी, वाणी, विद्या सारे तिच्या चरणी अर्पण केले. कवी म्हणूनदेखील ‘वैनायक` वृत्त निर्माण करून तेथेही सावरकर म्हणजेच स्वातंत्र्याची आस हा धडा घालून दिला. म्हणूनच सावरकर हेच स्वातंत्र्यवीर आहेत, असे म्हणावे लागेल. स्वातंत्र्यलक्ष्मीचा विजय असो!
 
 
 
- वैभवी गलांडे
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121