विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातील विशाल मेठी यांचा जन्म. सर्वसाधारण मुलांसारखे स्वतः चांगले शिक्षण घेऊन करिअर घडवावे, असे प्रत्येकालाच वाटत असते. तसेच विशाल यांनी ‘आयटी इंजिनिअरिंग’चे शिक्षण घेतले आणि नोकरीला सुरुवात केली. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी करत असताना त्यांचा नव्या तंत्रज्ञानाशी तसेच नवीन उद्योग करू बघणार्यांशी संपर्क येताच होता. अशातच दहा वर्षांपूर्वी विशाल यांनीही स्वतःचे काहीतरी स्वतंत्र अस्तित्व तयार करावे, या विचाराने काम करायला सुरुवात केली. त्यावेळी ते पुण्याच्या ‘पर्सिस्टंट’ कंपनीत काम करत होते. विशाल यांच्या स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याच्या विचारांना ‘पर्सिस्टंट’च्या आनंद देशपांडे यांचेही मार्गदर्शन लाभले. य सर्व गोष्टींमुळे २०१२ मध्ये विशाल यांनी नोकरी सोडून स्वतःच्या व्यवसायाचा मार्ग निवडला.
कुठला व्यवसाय करायचे हे काहीच ठरलेले नसल्याने त्यांनी अनेक उद्योग चाचपून बघितले, पण सुरुवातीला काहीच यश मिळाले नाही. असे विशाल यांनी सुमारे सात-आठ व्यवसाय करून बघितले, पण कुठल्याही व्यवसायात अपेक्षित यश आणि तेही प्रामुख्याने आर्थिक यश न मिळाल्याने विशाल यांनी स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचा विचार सोडून दिला. विशाल यांच्या या धडपडीच्या काळात त्यांना बरेच अनुभव आले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना भारतात उदयास येत असणारे अनेक ‘स्टार्टअप्स’ जवळून बघता आले. त्यांची धडपड, त्यांचे विचार त्यांना समजून घेता आले. या सर्व अनुभवातून त्यांच्या असे लक्षात आले की, भारतात अशा एका सर्वसमावेशक ‘प्लॅटफॉर्म’ची गरज आहे की, जिथे या सर्व स्टार्टअप्सना एकत्र येण्याची, विचारांची देवाणघेवाण करण्याची, तसेच एकमेकांमध्ये व्यवसायवृद्धीसाठी संधी मिळण्याची गरज आहे.
भारतात सध्या असा कुठलाही प्लॅटफॉर्म नसल्याने हे ‘स्टार्टअप्स’ विखुरलेले आहेत. या अशा विखुरण्याने या सर्व ‘स्टार्टअप्स’चे नुकसानच होते आहे. कारण, आज जर १०० ‘स्टार्टअप्स’ येत असतील, तर त्यातले ८० ‘स्टार्टअप्स’ बंद होतात. याचे कारण त्यांना प्रामुख्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. बर्याचदा फक्त पोटापुरते कमवून त्यांची वाटचाल सुरू असते. हे जर असेच चालू राहिले, तर त्यांचे मोठ्या व्यवसायात रूपांतर होणार कसे? त्यांना मार्गदर्शन मिळणार कसे, यासाठी कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे आणि नवीन उदयाला येणारे ‘स्टार्टअप्स’ आणि व्यवसायवृद्धी यामधली जी दरी आहे ती भरून निघाली पाहिजे आणि विशाल यांनी याच भावनेतून काम करण्यास सुरुवात केली आणि २०१६ मध्ये पुण्यात जन्म झाला ‘जे फॉर ई’चा.
‘जस्ट फॉर आंत्रप्रेन्युअर्स’ म्हणजेच ‘जे4ई’ ही भारतातील ‘स्टार्टअप्स’साठी काम करणारी एक संस्था आहे, ज्या संस्थेमध्ये ‘स्टार्टअप्स’ना एकत्र येण्यासाठी, त्यांचे विचार ‘शेअर’ करण्यासाठी उद्योग वाढवण्यासाठी, त्यांच्यातील कौशल्यांचा विकास करण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करते. या संस्थेत येणार्या ‘स्टार्टअप्स’ना फार काही बंधने नाहीत. या ‘स्टार्टअप्स’ना त्यांचे नाव ‘रजिस्टर’ करण्यासाठी कुठलेही शुल्क भरावे लागत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे ग्रुप्स तयार केले जातात. या संस्थेत तीन गोष्टींवर भर दिला जातो. पहिला म्हणजे नेटवर्क तयार करणे त्यासाठी दर आठवड्यातील तीन दिवस या सर्व सभासदांची एक मीटिंग घेतली जाते. त्यात आपल्या व्यवसायाची माहिती, त्यातील नवीन संकल्पना, तंत्रज्ञान या सर्व गोष्टींबद्दल माहितीचे आदानप्रदान केले जाते, ज्यातून हे सभासद आपल्या व्यवसायवृद्धीसाठी एकमेकांशी जोडले जाऊ शकतात, जेणेकरून त्यांना या गोष्टींचा फायदा होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बर्याच ‘स्टार्टअप्स’च्या मालकांकडे व्यवसायासाठी आवश्यक कौशल्ये नसतात, नेतृत्वगुण नसतात, त्यामुळे त्यांचे व्यवसाय प्रगती करू शकत नाहीत. यामुळे ‘जे फॉर ई’मध्ये या सर्व कौशल्यांवर काम केले जाते. ‘स्टार्टअप्स’ना या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्यामध्ये व्यावसायिकता, नेतृत्वगुण आणि नियोजनाची कौशल्ये विकसित करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते.या पुढची गोष्ट या संस्थेचा सर्वात मोठी ‘युएसपी’ म्हणजे या संस्थेतून या ‘स्टार्टअप्स’ना नवीन संधी निर्माण करून दिल्या जातात.
या संधींमुळे व्यवसाय वृद्धीची दिशा मिळण्यास मदत होते. या संस्थेत दहा हजार रुपये भरून वार्षिक सभासदत्व मिळवता येते. या सभासद वर्गणीमुळे नोंदणी केलेल्या ‘स्टार्टअप्स’ना दर आठवड्याला होणार्या सर्व मिटिंग्सना उपस्थित राहता येते. त्यांना संस्थेकडून मार्गदर्शन मिळवता येते. सध्या कोरोना काळामुळे सर्वच उद्योगक्षेत्राला जोरदार नुकसान सहन करावे लागले आहे. त्यामुळे सध्या या सभासद वर्गणीमध्ये थोडे बदल करून या दहा हजार रुपयांमध्ये दोन वर्षांचे सभासदत्व मिळवता येणार आहे. याशिवाय ज्यांना या संस्थेचे सभासद व्हायचे नाही, पण दर आठवड्याला होणार्या मिटिंग्सना उपस्थित राहायचे आहे, अशा ‘स्टार्टअप्स’ना संपूर्णपणे निःशुल्करित्या कोणत्याही तीन मिटिंग्सना उपस्थित राहता येईल. त्यामुळे ही संधीसुद्धा ‘जे फॉर ई’कडून उपलब्ध आहे. बर्याचदा असे असते की, आपल्याकडे संकल्पना असतात, पण आपल्याला हे माहीत नसते की, त्यांच्यापासून उद्योग सुरु कसा करावा? त्यामुळे आपण पडत-धडपडत उद्योग सुरू करतो, पण पदरी अपयशच येते. अशा नवीन उद्योजकांसाठीही ‘जे फॉर ई’ काम करते. ज्यांना अशा प्रकारच्या अडचणी आहेत, अशांना इथे मोफत मार्गदर्शन मिळते. जर तेथील मार्गदर्शकांना ते उद्योग आवडले, तर ते मार्गदर्शक आपल्याला उद्योग कसा उभा करायचा, याबद्दल सविस्तरपणे सांगतात, जेणेकरून या नवीन संकल्पना पुढे येतील.
‘जे फॉर ई’च का? तर इथे भारतीय संस्कृतीप्रमाणे बंधुभाव या गोष्टीला खूप महत्त्व दिले जाते. आपल्याकडे जसे एकत्र मोठे होण्याला महत्त्व आहे, तसे इथेही एकत्र होण्यास महत्त्व आहे. ’एकमेकां साहाय्य करू अवघे धरूनि सुपंथ’ या उक्तीप्रमाणेच ही संस्था काम करते. कारण, संस्थेचा इतरांबरोबर स्वतःची वाढ झाली पाहिजे, यावर विश्वास आहे. त्यामुळे ही संस्था त्याप्रमाणेच काम करते आणि आतापर्यंत पाच हजारांहून अधिक ‘स्टार्टअप्स’ त्यांनी जोडले आहेत, मोठे केले आहेत. अशा या समाजकार्यातून इतरांबरोबर स्वतःचीही उन्नती साधून घेणार्या विशाल मेठी यांचा व तसेच त्यांच्या ‘जे फॉर ई’चा प्रवास खरोखरच स्पृहणीय आहे.
स्टार्टअप्सना संदेश : आपण सर्वजण अनुकरणप्रिय असतो, पण व्यावसायिकाने नेमके तेच टाळायला हवे. दुसर्याने त्या संकल्पनेवर व्यवसाय करून यशस्वी होऊन दाखवले म्हणून आपणसुद्धा तेच करून यश मिळवू शकतो, हा समज जर आपण ठेवला तर नक्कीच आपण चुकतोय. आपल्याला स्वतःच्या संकल्पना तयार करता आल्या पाहिजेत, जेणेकरून त्यामध्ये आपण आपले कर्तृत्व दाखवू शकू. अजून एक गोष्ट नवीन येणार्या उद्योजकांनी केली पाहिजे, ती म्हणजे आपल्या स्वतःवरचा विश्वास हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे, हे ओळखले पाहिजे. या सर्व गोष्टी आपण करू शकलो, तरच यशस्वी व्यावसायिक होता येईल
- हर्षद वैद्य.