आरं आरं आबा जरा थांबा...

    22-Apr-2022
Total Views | 117
 
 
ipl
 
 
सध्या सुरू असलेल्या ‘इंडियन प्रीमिअर लीग’(आयपीएल) स्पर्धेचा भारतीय पुरुष क्रिकेट संघाला चांगला फायदा होणार आहे. आगामी ‘टी-20’ विश्वचषक स्पर्धेसाठी संघबांधणी करण्याच्या दृष्टीने भारतीय संघासाठी अनेक खेळाडूंचे पर्याय उपलब्ध होत आहेत. भारतीय संघासाठी ही चांगली बाब आहे. परंतु, यामुळे निवड समितीपुढील आव्हानांमध्ये मात्र वाढ झाली आहे. या सर्व खेळाडूंचा योग्य विचार करून मजबूत संघबांधणी करण्याचे आव्हान निवड समितीपुढे असणार आहे. निवड समिती या स्पर्धेचा आढावा घेत असून त्यानुसार आपले काम करत आहे. मात्र, काही माजी क्रिकेटपटूंनी खेळाडूंच्या निवडीबाबत आत्ताच सल्ले देण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळते.
 
 
 
‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु’ (आरसीबी) संघाचा यष्टिरक्षक दिनेश कार्तिक हा आगामी ‘टी-20’ विश्वचषक स्पर्धेत विजयवीराची भूमिका पार पाडू शकतो, असे भाकीत ‘लिटल मास्टर’ म्हणून ओळखले जाणारे सुनील गावस्कर यांनी केले. तसेच, भारतीय पुरुष संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी, “आगामी ‘टी-20’ विश्वचषक स्पर्धेसाठी भारताला माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसारख्या एका विजयवीराची आवश्यकता असून, कार्तिक यासाठी योग्य पर्याय ठरू शकतो,” असे म्हटले आहे. दिनेश कार्तिक सध्या उत्तम कामगिरी करत आहे, यात दुमत नाही. 2018 साली ‘निढास’ चषक स्पर्धेतील जेतपेदाच्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना षटकार खेचत कार्तिकने आपले कर्तृत्व सिद्धही केले. त्यामुळे तो उत्तम खेळाडू आहे यात शंका नाही.
 
 
परंतु, आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी अजून जवळपास पाच महिन्यांचा कालावधी शिल्लक असून खेळाडूंची निवड करण्यासाठीच्या दृष्टीने निवड समितीने या वेळेचा वापर करावा. दिनेश कार्तिकप्रमाणेच ‘आयपीएल’मध्ये आणखीही काही खेळाडू उत्तम प्रदर्शन करत असून यांचाही विचार करणे गरजेचे आहे. संपूर्ण स्पर्धा संपेपर्यंत निवड समितीने निरीक्षण करावे आणि त्यानंतरच योग्य तो निर्णय घ्यावा. संपूर्ण स्पर्धा संपेपर्यंत खेळाडूने आपल्या कामगिरीत सातत्य राखणे आवश्यक आहे. त्यामुळे स्पर्धा संपल्यानंतरच याबाबत निर्णय घेणे उचित राहील, असे जागतिक दर्जाच्या समीक्षकांचे म्हणणे आहे.
 
 
इतिहासाचाही विचार व्हावा 
 
 
दिनेश कार्तिकने २००४ साली भारतीय क्रिकेटमध्ये पर्दापण केले. दि. ५ सप्टेंबर, २००४ साली इंग्लंडविरूद्ध खेळविण्यात आलेल्या एकदिवसीय सामन्यात कार्तिकला खेळण्याची संधी देण्यात आली होती. पहिल्याच सामन्यात उत्तमप्रकारे यष्टीरक्षण करत कार्तिकने सर्वांवर छाप पाडली. त्यानंतर कार्तिकला भारतीय संघाकडून आणखी काही सामन्यांमध्ये खेळण्याची संधी देण्यात आली. परंतु, कार्तिकला आपल्या कामगिरीमध्ये सातत्य राखण्यात अपयश आले. याच काळात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे देखील भारतीय संघात पर्दापण झाले. धोनीने उत्तम प्रदर्शन केल्यानंतर जवळपास १५ वर्षे भारतीय संघात यष्टीरक्षकाची जबाबदारी त्याच्याकडेच होेती. मधल्या काळात धोनीकडे भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारीही सोपविण्यात आली होती. धोनीची भरभराट झाली.
 
 
परंतु, या काळात कार्तिककडे दुर्लक्ष झाले, असा मुद्दा काही जणांकडून उपस्थित होतो. मात्र, हे वास्तवाला धरून नाही. कार्तिकला भारतीय संघाकडून अनेकदा संधी देण्यात आली. कार्तिकने आत्तापर्यंत भारतीय संघाकडून २६ कसोटी सामने खेळले असून २५च्या सरासरीने १०२५ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एक शतक आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच, कार्तिकने भारतीय संघाकडून ९४ एकदिवसीय सामने खेळले असून 30च्या सरासरीने १७५२ धावा काढल्या आहेत. ९४ सामने खेळूनही एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर एकाही शतकाची नोंद नाही. ९४ सामन्यांमध्ये केवळ नऊ अर्धशतकांची नोंद त्याच्या नावावर आहे, तर कार्तिकने ३२ ‘टी-२०’ सामने भारताकडून खेळले असून, साधारणपणे 33च्या सरासरीनुसार ३९९ धावा केल्या आहेत.
 
 
‘टी-20’मध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही ४८ राहिली असून, त्याच्या नावावर एकाही शतक आणि अर्धशतकाची नोंद नाही. २००७ ‘टी-२०’ विश्वचषक ते २०१९च्या एकदिवसी सामन्याच्या विश्वचषक स्पर्धेपर्यंत कार्तिकला अनेकदा संधी मिळाल्याचा इतिहास आहे. परंतु, कामगिरीमध्ये सातत्य न राखता आल्यामुळे कार्तिक संघात आपली जागा बनवू शकलेला नाही. त्यामुळे आगामी ‘टी-२०’ संघात स्थान देताना त्याच्या इतिहासाचाही विचार व्हावा, असे मत क्रिकेट जाणकारांचे आहे.  
 
 - रामचंद्र नाईक 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121