
गुरू ग्रंथसाहिब देशाची एकता आणि अखंडतेचे प्रतिक
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : देशात ज्यावेळी धार्मिक कट्टरतावादाचे वादळ आले होते, त्यावेळी धर्मांध औरंगजेबासमोर गुरू तेगबहादूर यांनी हिंद दी चादर च्या रूपात पर्वताप्रमाणे उभे राहून त्याचा सामना केला होता. त्यामुळे नवभारताच्या निर्मितीमध्ये गुरुंचे आशीर्वाद हे अतिशय महत्वाच आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री लाल किल्ल्यावरून केले.
शीखांचे नववे गुरु तेगबहादूर यांच्या ४०० व्या प्रकाशपर्वानिमित्त दिल्ली येथील लाल किल्ल्यावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथून राष्ट्रास संबोधित केले. ते म्हणाले, देशात ज्या ज्या वेळी संकटे येतात, त्या त्या वेळी एक समर्थ व्यक्ती उदयास येतो. भारतात एकेकाळी धार्मिक कट्टरतेचे वादळ आले होते. धर्मास दर्शन, विज्ञान आणि आत्मशोधाचा विषय मानणाऱ्या भारतासमोर धर्माच्या नावे अत्याचार करणाऱ्यांचे आव्हाने उभे राहिले होते. मात्र, त्यावेळी धर्मांध औरंगजेबासमोर गुरु तेगबहादूर हे पर्वताप्रमाणे उभे ठाकले आणि भारताचे स्वत्व धर्मांथांना नष्ट करू दिले नाही. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना गुरु तेगबहादूर यांच्यासह आमच्या सर्व गुरुंच आशीर्वाद हे अतिशय महत्वाचे असल्याचेही ते म्हणाले.
पवित्र गुरुग्रंथसाहिब भारताची एकता आणि अखंडतेचे जिवंत प्रतिक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, त्यामुळेच ज्यावेळी अफगाणिस्तान संकट आले, त्यावेळी गुरुग्रंथसाहिबचे स्वरुप आणि आपले शीख बांधव यांना आपल्या मातृभूमीत परत आणण्याचे काम केंद्र सरकारने केले. शेजारी देशांमधील शीख बांधवांसह अल्पसंख्यांकाना भारतात आणण्याचे काम सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे (सीएए) सोपे झाले आहे. त्यामागेही आपल्या गुरुंचीच प्रेरणा आहे, त्यांच्याच प्रेरणेने आज जगात संघर्षाची स्थिती असतानाही भारत ठामपणे उभा राहून शांतता निर्माण करीत आहे. त्यासाठी संपूर्ण जगाचे लक्ष आज भारताकडे लागले आहे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या शंभरीकडे वाटचाल करीत असताना गुरुंच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन समर्थ अशा नवभारताच्या निर्मितीसाठी काम करणे आवश्यक असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नमूद केले.