'द काश्मिर फाईल्स' हा चित्रपट सर्वत्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तसेच हा चित्रपट एक मोठा चर्चेचा विषयदेखील बनला आहे. १९७५ नंतरचा हा पहिलाच चित्रपट आहे की जो कमी बजेटमध्ये बनूनही बॉक्सऑफिसवर १०० करोडच्या वर कमाई करत आहे असे ट्रेड अॅनलिस्टचे म्हणणे आहे. या चित्रपटामध्ये १९९० साली काश्मिरमध्ये काश्मिरी पंडितांसोबत झालेल्या नरसंहाराचे सत्य मांडण्यात आले असून संपूर्ण देशभरातून या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखेची सध्या सर्वत्र चर्चा सुरु असून अभिनेता चिन्मय मांडलेकरने साकारलेल्या बिट्टा कराटे या व्यक्तिरेखेची विशेष चर्चा होताना दिसत आहे. खरे तर बिट्टा कराटेच मूळ नाव हे फारुख अहमद डार असून सध्या सोशल मीडियावर त्याचे काही जुने व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पण मग हा फारुख नक्की बिट्टा कराटे बनला कसा हे आज जाणून घेऊयात.
असे म्हटले जाते की, काश्मिरचा रहिवाशी असणाऱ्या बिट्टाचे पाकिस्तानसोबत संबंध होते. तो जम्मू काश्मिर लिबरेशन फ्रंटचा दहशतवादी होता आणि त्याने भारताविरोधात बंड पुकारण्यासाठी पाकिस्तानामध्ये जाऊन दहशतवादासाठीचे विशेष प्रशिक्षण देखील घेतले होते. असे सांगितले जाते की, बिट्टा कराटे म्हणजेच मूळचा फारुख अहमद डार हा उत्कृष्ट कराटे खेळायचा आणि म्हणून त्याचे नाव बिट्टा कराटे पडले. काश्मीरमध्ये एक फुटीरतावादी नेता बनून त्याने आपण लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करत आहोत अशी स्वतःची एक ओळख निर्माण केली. पण काश्मिरमधील अनेक नागरिकांची हत्या करण्यामध्ये बिट्टाचा मोठा हात होता. बिट्टाने पाकिस्तानामध्ये जाऊन शस्त्र चालवण्याचे विशेष प्रशिक्षण घेतलं होतं आणि त्याचबरोबर मार्शलआर्ट मध्येही त्याने प्राविण्य मिळवले होते.
पाकिस्तानमध्ये दहशहतवादाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर अनेक वर्षांनी बिट्टा हा काश्मिरमध्ये परत आला. पण त्याच्या मनात मात्र एक वेगळेच षडयंत्र सुरु होते. काश्मीरमध्ये परत आल्यावर बिट्टाने खऱ्या अर्थाने भारताच्या विरोधातील काटकारस्थाने रचण्यास सुरुवात केली. काश्मिरमधील झालेला नरसंहार सुरू करण्यामध्ये बिट्टाचा मोठा हात होता. एका मुलाखतीमध्ये त्याने सांगितले होते की स्थानिक प्रशासनाला कंटाळून आपण दहशतवादी बनलो आणि आपण २० अधिक लोकांची हत्त्या केल्याचेही त्याने कबूल केले होते. तसेच रा. स्व. संघाच्या सतीश कुमारची आपण सर्वात प्रथम हत्त्या केल्याचेही त्याने कबूल केले होते.
बहुतांशी काश्मिरी पंडितांना मारण्याची सुरवात याच बिट्टा कराटेने केली होती. त्याला या हत्याकांडासाठी १९९० मध्ये अटक करण्यात आली होती. मात्र मुलाखतीमध्ये २० हून अधिक हत्या केल्याचे कबूल केलेल्या या बिट्टाने कोर्टात मात्र आपला गुन्हा कबूल करण्यामध्ये लबाडी केली. त्यामुळे पुराव्यांअभावी त्यावेळी त्याला सोडण्यात आले. ''बिट्टावर गंभीर आरोप असतानाही केवळ पुराव्याअभावी आरोपीला सोडावं लागत आहे. ज्यांना शिक्षा व्हायला हवी ते मात्र जामिनावर बाहेर मोकाट फिरत आहेत'', त्याची मुक्तता करताना असे कोर्टाकडून सांगण्यात सांगण्यात आले होते. कोर्टाकडून सोडण्यात आल्यानंतर बिट्टा हा पुन्हा जम्मू-काश्मिर लिबरेशन फ्रंटमध्ये सामिल झाला आणि त्यानंतर तो स्वतःला नेता म्हणवून घेऊ लागला. २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर एनआयए ने दहशतवादी फंडिंगच्या आरोपाखाली बिट्टाला अटक केली होती. तसेच त्यानंतर केंद्र सरकारने जम्मू काश्मिर लिबरेशन फ्रंटवर बंदी आणून देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाले म्हणून त्यातील अनेक नेत्यांना अटक केली होती.