मुंबई : बंगळूरमध्ये झालेल्या भारत विरुद्ध श्रीलंका दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेला २३८ धावांनी पराभूत केले आहे. तसेच, या विजयासह भारताने श्रीलंकेला २-० अशा फरकाने क्लीन स्वीप दिला आहे. या सामन्यात श्रेयस अय्यरने पहिल्या डावात ९२ धावांची खेळी तर दुसऱ्या डावात ६७ धावा केल्या. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. तर रिषभ पंतला त्याच्या कामगिरीसाठी मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.
भारतीय संघाने श्रीलंकेला विजयासाठी ४४७ धावांचे तगडे आव्हान दिले होते. मात्र श्रीलंकेचा ५९.३ षटकांमध्ये २०८ धावांवर आटोपला. यावेळी श्रीलंकेकडून कर्णधार दिमुख करुणारत्ने सर्वाधिक १०७ धावांची एकाकी झुंज दिली. तर कुसल मेंडिसने ५४ धावा केल्या. याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला विशेष कामगिरी करता आली नाही. दुसऱ्या डावात अश्विनने ४, जसप्रीत बुमराहने ३ तर अक्षर पटेलने २ आणि जडेजाने १ विकेट घेतल्या.