मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे सोमवारी मुंबईतील चांदीवाल आयोगासमोर हजर झाले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने या आयोगाची स्थापना केली आहे. परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. शंभर कोटी वसुलीप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या तुरुंगवास भोगत आहेत.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी केल्यानंतर त्यांनी अनिल देशमुखांवर लेटरबॉम्ब टाकला होता. देशमुखांनी पोलिस बदल्यांमध्ये घोटाळा केला असून बार मालकाकडून शंभर कोटी वसुली करण्याचे टार्गेट पोलिसांना दिले होते, असे गंभीर आरोप परमबीरसिंह यांनी केले होते. त्यानंतर अनिल देशमुख हे तपास यंत्रणांच्या रडारवर आले. या सर्व प्रकारांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने चांदीवाल आयोगाची नेमणूक केली होती. त्यामुळे आता या चौकशीनंतर आणखी काय समोर येते? ह्गे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.