नवी दिल्ली: भारतीय अर्थव्यवस्था 'ईज ऑफ डुईंग बिजनेस' मध्ये भारताने जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवले आहे. ग्लोबल इंटरप्रेनरशिप मॉनिटर २०२१-२२ या अहवालानुसार भारताने हे स्थान पटकावले आहे. ५०० संशोधकांच्या एका गटाने बुधवारी १० फेब्रुवारी रोजी आपला अहवाल सादर केला. केंद्र सरकारने सुरु केलेल्या विविध सुधारणांचा परिणाम आता दिसून येत आहे हेच निमित्ताने समोर आले आहे. केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षांत सुमारे २५ हजार जाचक नियम मागे घेतले आहेत, विविध सुधारणा अंमलात आणत आहे याचाच परिणाम म्हणून हे स्थान भारताला मिळाले आहे. या अहवालासाठी सुमारे दोन हजार लोकांनी मते नोंदवली होती.
या सहभागी लोकांपैकी ८२ टक्के लोकांनी सांगितले की भारतात व्यवसाय सुरु करणे सोपे आहे. ८३ टक्के लोकांचे असे मत आहे की भारत व्यवसायाच्या चांगल्या संधी आहेत. भारतीयांकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक ती कौशल्ये आणि ज्ञान असल्याचे ८६ टक्के लोकांनी सांगितले. भारतीय लोक अपयशाच्या भीतीने व्यवसाय सुरु करायला घाबरतात असे ५४ टक्के लोकांचे म्हणणे होते. कोरोना साथीच्या काळात नोकरीच्या संधी कमी झाल्यामुळे बरेच जण व्यवसाय करण्याकडे वळले असे दिसून आले आहे. भारतात स्टार्टअप संस्कृतीही बऱ्यापैकी रूजत चालल्याचे दिसून येते आहे असेही मत या अहवालात नोंदवले आहे.