
सीमावादाकडे पाहताना भाषा, स्थानिक संस्कृती, वैविध्य महत्त्वाचे आहे, हेदेखील मान्य केले पाहिजे. कारण, व्यापक हिंदू समाज अशा बहुविधांमधूनच निर्माण झालेला आहे. त्यामुळे त्याचा योग्य तो सन्मान राखलाच पाहिजे. मात्र, त्याचे राजकारण करून एकमेकांना हुलकावण्या देण्यापेक्षा आपल्या परिसराचा विकास कसा करता येईल, याचाही विचार केला पाहिजे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातील 40 गावांवर दावा ठोकला अन् महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाला पुन्हा तोंड फुटले. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भाग धुमसत असून ‘कन्नड रक्षण वेदिके’च्या गुंडांनी महाराष्ट्रातील वाहनांना लक्ष्य केल्याचे दिसून आले. त्या पार्श्वभूमीवर कन्नडिगांच्या मुजोरीला वेसण घाला, अशी मागणी सीमा भागातून होत आहे. मात्र, देश महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत असताना महाराष्ट्र-कर्नाटकसारखी दोन राज्ये सीमाभागावर भांडतात, ही देश म्हणून दुर्दैवी घटना म्हणावी लागेल. कारण, महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या पुढारलेले राज्य, तर कर्नाटकदेखील पारंपरिक उद्योगधंद्यांसह माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यवसायात आघाडीवरचे राज्य. त्याच दोन राज्यांनी सीमाप्रश्नावर भांडणाला सुरुवात केल्याने त्याचा परिणाम विकासावर होऊ शकतो. त्याचवेळी स्थानिकांच्या भावना, भाषिक अस्मिता दखलपात्रच नाहीत, असेही नाही. दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या मुद्द्यावर राजकारणाचा ऊहापोह होऊ नये इतकेच.
राज्यघटनेने कल्याणकारी राज्याची अपेक्षा व्यक्त केलेली आहे. पण, कल्याणकारी राज्य अयशस्वी ठरतात तेव्हा राज्यकर्त्यांकडून सीमावाद, भावना, अस्मिता वगैरेंचे राजकारण खेळले जाते. त्या माध्यमातून जनतेच्या मनातल्या भावना चेतवल्या जातात व त्यावर आपली पोळी भाजण्याचे काम राज्यकर्त्यांकडून केले जाते. महाराष्ट्र-कर्नाटकात सुरू असलेल्या वर्षानुवर्षांच्या सीमावादाकडे पाहिल्यास त्याचाच दाखला मिळतो. त्यातूनच दोन्ही राज्यांतील सीमावादाच्या सोडवणुकीसाठी याआधी अनेकदा अनेक तोडगे निघाल्याचे, उत्तर मिळाल्याचे म्हटले गेले. मात्र, त्यातला एकही तोडगा दोन्ही पक्षांनी कधी मान्य केला नाही. परिणामी, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे भिजत घोंगडे पडलेलेच आहे. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयातही पोहोचलेले असून तिथे ते प्रलंबित आहे. पण, त्याआधीच महाराष्ट्रातील गावांवर हक्क सांगणे अयोग्यच!
सीमावादाचा मुद्दा समोर असताना महाराष्ट्राची, संबंधित गावांची आजची स्थिती याचा सर्वपक्षीयांनी विचार केला पाहिजे. असे का झाले, या प्रश्नाचेही उत्तर शोधले पाहिजे.देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपने महाराष्ट्रावर पाच वर्षे राज्य केले. पण, त्यांच्याआधी महाराष्ट्राचे राज्यकर्ते कोण होते? 1960 साली महाराष्ट्राची स्थापना झाली आणि राज्यात काँग्रेसचा कारभार सुरू झाला. त्यानंतर 1995 पर्यंत महाराष्ट्रावर काँग्रेसचाच सलग अंमल होता. त्यात यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाचा समावेश होता. पण, यातल्या एकाही मुख्यमंत्र्याला सीमाभाग महाराष्ट्रात सामील करून घेण्यात यश मिळाले नाही. त्यापैकी शरद पवार तर आता ‘मी सीमाभागात जाईन’ वगैरे भाषा करत आहेत. पण, ते जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, केंद्रात कित्येक वर्षे मंत्री होते, तेव्हा कुठे गेले होते? त्यानंतरही 1999 पासून 15 वर्षे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचेच सरकार होते. तेव्हाही त्यांनी सीमाप्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसले नाही.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनेचेही तसेच. सीमाभागाचे राजकारण वेळोवेळी शिवसेनेच्या वाढीसाठीचे इंधन ठरले. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर खुद्द उद्धव ठाकरेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तसेच त्याआधीही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने राज्याची सत्ता हाताळली, केंद्रातील मंत्रिपदेही उपभोगली, पण तेव्हाही त्यांनी कधी सीमाप्रश्नाचा गुंता सोडवण्यासाठी पुढाकार घेतला नाही. त्यांनी व त्यांच्या संजय राऊतांनी यावरून भाजपवर आगपाखड करण्यात काहीच अर्थ नाही. सत्ता हाती होती, तेव्हा त्यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी काहीही केलेले नाही, हेच तथ्य आहे.सीमावादाकडे पाहताना भाषा, स्थानिक संस्कृती, वैविध्य महत्त्वाचे आहे, हेदेखील मान्य केले पाहिजे. कारण, व्यापक हिंदू समाज अशा बहुविधांमधूनच निर्माण झालेला आहे. त्यामुळे त्याचा योग्य तो सन्मान राखलाच पाहिजे. मात्र, त्याचे राजकारण करून एकमेकांना हुलकावण्या देण्यापेक्षा आपल्या परिसराचा विकास कसा करता येईल, याचाही विचार केला पाहिजे.
बेळगाव, निपाणी, कारवारसह सीमाभाग महाराष्ट्रात येण्याच्या मागणीवर ठाम आहे, तर त्या सीमेवरील, तसेच नाशिकमधीलही काही गावे शेजारच्या राज्यात जाण्याचे इशारे देत आहेत. हा प्रकार नेमका काय? तर त्याचे उत्तर विकासाच्या मुद्द्यातच सामावलेले आहे.महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात कर्नाटकाने नेहमीच दंडेली केल्याचे पाहायला मिळालेले आहे. आताही कर्नाटकमधून दडपशाहीचीच भाषा निघत आहे. पण, भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वानेसुद्धा भाषिक अस्मिता आपला मुद्दा असल्याचे कधी म्हटलेले नाही. तसे असूनही कर्नाटकचे मुख्यमंत्री नेमक्या कोणत्या आमिषाला बळी पडून महाराष्ट्रातील 40 गावांवर दावा सांगणे वगैरे भाषा वापरत आहेत, हे शीर्ष नेतृत्वाने पाहिले पाहिजे. देशात भाषावार प्रांतरचना करण्यात आली.
त्या प्रांतरचनेवेळी झालेली चूक म्हणजे आजचा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आहे. पण, असे अनेक राज्यांत सीमावादाचे मुद्दे होते, त्यात ईशान्येकडील राज्यांचाही समावेश होता. पण, त्यातले बरेच वाद आता संपुष्टात आल्याचे दिसते. त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विशेषत्वाने लक्ष घातले. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा अमित शाह यांच्यापुढे मांडणार असल्याचे म्हटले आहे. गेल्या 72 वर्षांपासून सीमावादामुळे महाराष्ट्र व कर्नाटकात वितुष्ट निर्माण झाले. भाषावार प्रांतरचना व सदोष भाषावार प्रांतरचना अस्तित्वात आणणारे नेतेच यासाठी कारणीभूत आहेत. पण, सीमावादाचा प्रश्न चर्चेच्यामाध्यमातूनच सुटू शकतो व त्यासाठीच फडणवीस हा मुद्दा अमित शाह यांच्यापुढे नेऊ इच्छितात. त्यातून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न सुटला, तर ती नक्कीच ऐतिहासिक घटना ठरेल. तसेच, भाषावार प्रांतरचना व महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादामुळे निर्माण झालेली राष्ट्रीय शोकांतिकाही संपेल.