मुंबई : उ. बा. ठा. गटाच्या महिला नेत्या सुषमा अंधारे यांनी मुलुंड येथील सभेतून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देत मनसेचे नेते प्रकाश महाजन म्हणाले, "सुषमा अंधारे काहीही बोलते. तिच्या मेंदूला काय नारू झालाय का? या बाईला काय बोलावे? मी बीड जिल्ह्यातील आहे. तीही बीड जिल्ह्यातील आहे. तिला बोलायला ठेवले, भुंकायला नाही. काय बोलली ती?" असे म्हणत माध्यमांशी संवाद साधला.
पुढे ते म्हणाले, "सुषमा अंधारेंमुळेच उद्धव ठाकरेंना लवकरच महिलांच्या बंडाला सामोरे जावे लागणार. तसेच, कालपरवा मुसलमान झाल्यासारखे सुषमा अंधारे आदाब आदाब करत फिरत होत्या. आधी मातोश्री-२ कशी झाली ते सांगावे? उद्धव ठाकरेंना विचारावे." राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या जन्मापासून राज्यात जातीयवादी राजकारण सुरू झाल्याचा आरोप केला होता. यावर पलटवार करत अजित पवार म्हणाले होते, "राज ठाकरे यांचे आरोप हस्यास्पद आहेत. त्यात तसूभरही तथ्य नाही. नखभरही तथ्य नाही." यावरही महाजन यांनी पलटवार केला. ते म्हणाले, "तुम्ही जातीयवादी नाही तर राष्ट्रवादीने प्रमाण दाखवून द्यावे. त्यांच्या पक्षात विशिष्ट जातीचे लोक आहेत. त्यांचेच वर्चस्व आहे हे दिसून येते. हाताच्या कंगनाला आरसा कशाला पाहिजे?" असे महाजन म्हणाले.