मुंबई : अंधेरी पूर्व येथे होत असलेल्या पोटनिवडणुकीत भाजपने आपला उमेदवार मागे घेत निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. भाजपने घेतलेल्या या भूमिकेनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र अजबगजब तर्क लढवत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले आहेत. अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध होण्यामागे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीचे गणित आहे, असा दावा पटोले यांनी केला आहे.
सोमवारी माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, 'अंधेरी येथे होणारी निवडणूक बिनविरोध करण्यामागे एमसीए निवडणुकांची पार्श्वभूमी आहे. एमसीएमधील गणिते जुळवण्यासाठी हे प्रयत्न करण्यात आले आहेत,' असा तर्क पटोलेंनी बांधला आहे. मात्र, त्यांच्या या तर्काला भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने साफ खोडून काढले आहे.