तेजस तत्त्व
तेजस म्हणजे प्रकाश. प्रकाशाला ज्ञान मानलेले आहे. तेजस तत्त्वाची प्रमुख देवता जी श्री गणेश आहे, तिला ज्ञानमूर्ती मानलेले आहे. बुद्धिविना ज्ञान मिळू शकत नाही, म्हणून श्री गणेशाला बुद्धिदेवतासुद्धा मानलेले आहे. आप तत्त्वातून हे तत्त्व उत्पन्न होते, म्हणून श्री गणेशाला आपतत्त्व देवता शिवाचा पुत्र मानलेले आहे. प्रकाशतत्त्व सर्व तत्त्वाचा मध्य असल्यामुळे तेजस तत्त्वाला मध्य तत्त्वसुद्धा मानलेले आहे. म्हणून सर्व शुभकार्यांच्या वेळी श्रीगणेशाचे स्मरण करुन पूजन केले जाते. उष्णतारहित प्रकाश म्हणजे आपतत्त्वाची शुभ्र आभा आणि उष्णतेसह प्रकाश म्हणजे तेजस तत्त्व आहे. आपतत्त्व स्वयंवेष्टित आहे. (Bottled waves), तर तेजसतत्त्व पुढे जाणारे (Unbottled waves) आहे. सर्व जगातील आदानप्रदान प्रकाशामुळे होते. त्यामुळे तेजस तत्त्वाच्या साधकाला अखिल विश्वाचे ज्ञान होते. म्हणूनच श्री गणेशाला ज्ञानविज्ञान मूर्ती मानलेले आहे. विलक्षण दाह हे तेजस तत्त्वाचे अपत्य आहे, म्हणून ध्यान करताना या तत्त्वाच्या साधकांना दाहाचा अनुभव येतो. त्याचे सांत्वन ‘ओम् नम: शिवाय’ मंत्राचा जप करून होते. भगवान शिवाने विष प्राशन केल्याची कथा याच दाहशांतीचे रूपकात्मक प्रतीक आहे. प्रत्यक्ष इतिहास नाही.
तेजस तत्त्वीय साधकाचे शरीर आणि स्वभाव
तेजस तत्त्वाचे साधक श्याम किंवा तांबूस वर्णाचे असतात. शरीर साधारणतः स्थूल, मोठे जाड ओठ, ढेरपोट, हसरे मुख अशी यांची शरीररचना असून ते आरामप्रवण असतात. हे बुद्धिमान तसेच धनवान असतात. निर्धन तेजस तत्त्व साधक जर धन कमावू लागले, तर विपुल धन मिळवू शकतात. उदार अंत:करणाचे असतात, पण जर हट्टास पेटले तर फार जिद्दी असतात. तेजस तत्त्वाचे साधक कलावंत असू शकतात. या तत्त्वाची रचना दृष्टी समोर ठेवून श्री गणेशाची मूर्ती साकारली आहे. प्रत्येक तत्त्वाची देवता या तत्त्वाचा गुण, वर्ण आदी भाव लक्षात घेऊन साकारलेली आहे. वैदिक परंपरेत देवतेचे चित्रीकरण आणि त्यांचे स्वभावदर्शन यात तत्त्वदर्शन आणि तत्त्वानुभूती आहे.
वायू तत्त्व साधक, शरीर आणि स्वभाव
वायू तत्त्व साधकाची शरीरयष्टी फार मजबूत आणि श्याम किंवा आरक्त वर्णाची असते. डोळे तिरपे, लांब हात, जाडजूड खांदे, बारीक हनुवटी अशी मूर्ती असून हसताना जीवणी वरच्या बाजूला विस्फारली जाते, जसे काही वानरच हसत आहे. याची छाती विशाल, पण पोट आणि कंबर सिंहासारखी कृश असते. हे फार पराक्रमी, बलवान आणि बुद्धिमानसुद्धा असतात. यांचा पिंड भक्तिप्रदान असतो. यांची वृत्ती श्रद्धा केंद्रावर सर्व काही समर्पण करण्याची असते. या तत्त्वाचे साधक बुद्धिमान असूनसुद्धा स्वत:ची बुद्धी चालवित नाहीत. सर्व बाबतीत त्यांना दुसर्याकडून मार्गदर्शन पाहिजे. रामायणात वर्णिलेले ‘वायुसूत’ हनुमानाचे चरित्र या प्रकारचे आहे. वायुसूत हनुमान म्हणजे वायुतत्त्वाचे हुबेहूब वर्णन आहे. त्यांचा पराक्रम, त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांचे रामायणचित्रित जीवन हे वायुतत्त्वाचे अनुभव आहेत. संपूर्ण ‘रामायण’ वायुतत्त्वाच्या पराक्रमाने भरलेले आहे. ‘रामायण’ योगसाधनेतील दिव्य अनुभवांनी परिपूर्ण असे महाकाव्य आहे.
आकाशतत्त्वीय शरीर आणि स्वभाव
आकाशतत्त्वाच्या साधकांचे शरीर सर्वांगसुंदर आणि स्वभाव शांत असतो. प्रखर बुद्धिमान आणि पराक्रमी असूनसुद्धा साधे आणि शांत दिसतात. यांचा वर्ण साधारणतः शामल असतो. काही साधक गौर वर्णाचेसुद्धा असतात. यांचे कान, नाक, मुख, हनुवटी, भुवया, नेत्र, कंठ, खांदे, मांड्या, पाय सुंदर आणि प्रमाणबद्ध असतात. मन कमलासारखे, जिवणी लहान असते. फार उंचही नसतात किंवा ठेंगणेही नसतात. प्रयत्न केल्यास हे कलावान आणि गुणवान बनू शकतात. आपले जीवन आणि ज्ञान हे सर्वांसाठी आहे, अशी भावना बाळगून हे जगतात. परिपूर्ण शरीर आणि शांत स्वभाव म्हणजे आकाशतत्त्व देवतेचे आणि त्यांच्या खर्या तत्त्वाचे प्रतीक आहेत. उदाहरणार्थ संत श्री ज्ञानेश्वर, संत मीराबाई, संत तुकाराम आणि स्वामी विवेकानंद. अपूर्ण शरीराचा साधक अपूर्ण तत्त्वाचाच राहील, हे एक सत्य आहे. सर्वगुण आणि रुपसंपन्न राहूनसुद्धा आकाशतत्त्वाचे साधक निरहंकारी असतात.
वायू तत्त्वाच्या परिचयानंतर आकाश तत्त्वाचे अनुभव येतात. म्हणून वायू तत्त्वाच्या देवतांना आकाशतत्त्वीय देवतांचे वाहन दाखविलेले आहे. गरुडाला भगवान श्री विष्णू आणि श्रीकृष्ण यांचे तर हनुमंताला रामाचे वाहन मानलेले आहे. समर्थ रामदास स्वामी यांना श्रीहनुमानजींच्या दर्शनानंतरच रामदर्शन घडले, अशी कथा आहे. सर्व वर्णांनी शोभिवंत अशी नीलवर्णाची गहनता म्हणजे आकाश तत्त्व आहे. ‘दिव्य नीलिमा’ हा आकाशतत्त्वाचा परिचय आहे. साकारपिंडी साधकाला नीलश्याम भगवान राम किंवा कृष्ण यांच्या रुपाने आकाश तत्त्वाचे साकारदर्शन होईल. आता तो साधक नसून स्वत:च भगवान परमात्मा होतो. तो सर्वत्र असूनही सर्वांच्या बाहेर आहे. संत नानकांनी याचे वर्णन केलेले आहे.
सर्व-निवासी सदा अलेपा वोही संग समाई।
काहे रे बन खोजत जाई।
मन आणि देवता दर्शन
मन नावाची कोणतीही स्वतंत्र वस्तू किंवा अवस्था नाही. प्रत्येक जन्मात मनुष्याच्या व्यवहारातून त्याच्यावर जे संस्कार होतात, त्यात पुढील जन्मात भर पडून त्याच्यावरील संस्कार वाढत जातात. या संस्काररुपी प्रवृत्तीला ‘मन’ असे म्हणतात. ‘मन’ म्हणजे संस्कार. प्राप्त संस्कारानुसार मनाचा स्तर उच्च किंवा नीच राहतो. मन आहे तोवर संस्कार होत राहतीलच व मनाचा लोप झाल्यावरच संस्कारग्रहण थांबेल. ‘दर्शन साक्षात्कार’ ही मनाची अत्युच्च संकल्पाची आणि प्रबळ अवस्था आहे. म्हणून ‘देवतांचे दर्शन’ हा एक सत्य आणि सजीव अनुभव आहे. जोपर्यंत ‘मन’ नावाची अवस्था आहे, तोपर्यंत ‘दर्शन साक्षात्कार होईल. मनाचा लोप झाल्यास उन्मनी अवस्थेत दर्शनही नाही, द्रष्टाही नाही व दृश्यही नाही. ‘साकारदर्शन’ ही मनाची अवस्था निर्विकल्प अवस्थेहून खालच्या पातळीची आहे. म्हणून वैदिक परंपरेत निराकार, निर्गुण यांना अधिक महत्त्व आहे. लेखक जरी निराकाराचा साधक असला, तरी लेखकाने योगेश्वर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने पृथ्वीतत्त्वापासून आकाशतत्त्वापर्यंत साकारदर्शनाचा लाभ मिळविलेला आहे. ज्या योगेश्वर संत श्री ज्ञानेश्वर माऊलींनी व ७०० वर्षांपूर्वी पुण्याजवळ आळंदी येथे ‘संजीवन समाधी’ घेतलेली आहे, त्यांना लेखकाने पृथ्वीतत्त्व देहधारी गुरु मानलेले आहे. लेखक हा वास्तविक योगमार्गाचा साधक आहे. परंतु, माऊलींच्या कृपेने लेखकाला भक्तिमार्गाचेसुद्धा अनुभव आहेत. निर्विकल्प समाधी ही लेखकाची स्वत:ची अवस्था आहे. (क्रमशः)
योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)