मालवण : “वादळ, भूकंप झाला की, आमदार वैभव नाईक याचा ‘सीझन’ चालू होतो. त्यांचा पत्र्याचा धंदा आहे. लाज वाटली पाहिजे शिवसेनेच्या आमदाराला. या आपत्ती काळामध्ये त्यांचे पत्रे विकणे सुरू आहे. ज्यावेळी जनतेला मदत पाहिजे तेव्हा हे व यांचे मंत्री नुसते आश्वासने देत आहेत. मुख्यमंत्री येऊनसुद्धा जनतेला मदत जाहीर होत नाही ही शोकांतिका आहे,” असा प्रहार माजी खासदार व भाजप नेते निलेश राणे यांनी केला. “मुख्यमंत्री यांच्याशी बोललेले व्हिडिओ समाजमाध्यमातून पसरवायचे व आपली पाठ थोपटून घ्यायची कामे आमदार नाईक करत असून जनतेशी त्यांचे देणेघेणे नाही,” असा टोला निलेश राणे यांनी लगावला.
“कोकणने शिवसेनेला मते द्यायची. मात्र, शिवसेनेने कोकणला काय दिले? आठ दिवस उलटले तरी वादळग्रस्तांना मदत जाहीर होत नाही. वैभव नाईकला प्रशासनामध्ये काडीची किंमत नसून अधिकारी भीक घालत नाहीत. आठ दिवस वीज, पाणी या मूलभूत गराजांपासून नागरिक वंचित आहेत. शिवसेनेकडून जनतेला अपेक्षा नाहीत त्यामुळे जी मदत शक्य आहे ती नुकसानग्रस्तांपर्यंत पोहोचवण्याचे काम भाजप करत आहे. मदतीचे सेवाकार्य यापुढेही सुरूच राहील. भाजप म्हणून आम्ही जनतेसोबत आहोत,” असा विश्वास भाजपनेते प्रदेश सचिव निलेश राणे यांनी सोमवार, दि. 24 मे व्यक्त नुकसानग्रस्तांना दिलासा दिला.
‘तोक्ते’ चक्रीवादळानंतर नुकसान झालेल्या मालवण, देवबाग, वायरी व अन्य परिसराची भाजपनेते निलेश राणे यांनी पाहणी करून नुकसानग्रस्तांना पत्रे, ताडपत्री व जीवनावश्यक वस्तू आदींची मदत केली. यावेळी नागरिकांना दिलासा देताना कौलांचेसुद्धा वितरण केले जाईल, असे सांगितले. देवबाग गावामध्ये नुकसानग्रस्त ग्रामस्थांच्या घरी जाऊन त्यांना प्रत्यक्ष पाहणी केली.
“याठिकाणी आठ दिवस लोटले तरी वीजपुरवठा सुरळीत करण्यात आलेला नाही. ज्या ठिकाणी वीज सुरळीतपणे सुरू झाली आहे, त्याचे श्रेय जनतेला जाते. त्यामुळे सत्ताधारी आमदार, खासदार, पालकमंत्री पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. त्यांचा प्रशासनावर अंकुश नसल्याने मालवण अजूनही अंधारात आहे. मात्र, आम्ही सतत प्रशासनाच्या संपर्कात आहोत. वीजसाहित्याची कमतरता होती. ती दूर करण्यात आली आहे. बाहेरून आलेले कर्मचारी परत जात असताना आम्ही जिल्हाधिकार्यांना सांगून त्यांना थांबवले आहे. त्यामुळे यापरिस्थितीमध्ये भाजप जनतेला सर्वतोपरी मदत करणार आहे,” असे निलेश राणे यांनी सोमवारी पाहणी दौर्यावेळी सांगितले.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस बाबा परब, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, युवामोर्चा तालुकाध्यक्ष विक्रांत नाईक, भाई मांजरेकर, जॅक्सन फर्नांडिस, अवी सामंत यासह ग्रामस्थ उपस्थित होते.