आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांनी केली कारवाईची मागणी
मुंबई : बँकेतील घोटाळ्यांमुळे खातेदारांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. कर्नाळा बँकेत ६५० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा उघडकीस आल्यानंतर बँकेच्या व्यवहारांवर मर्यादा आली. ठेवीदार आणि खातेधारकांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळावे यासाठी स्थानिक आमदार व संघर्ष समितीच्या माध्यमातून जनतेचा आवाज शासनापर्यंत वारंवार पोहोचवला जात आहे. मात्र, सरकार खातेदारांना न्याय मिळवून देण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे आक्रमक होत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधान भवनाच्या पायर्यांवर, निदर्शनं करत, कर्नाळा बँक घोटाळ्याची चौकशी करून तात्काळ कारवाई करा, अशी मागणी केली.
कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी रायगड जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह संचालक, अधिकारी अशा ७६ जणांविरोधात एफआयआर दाखल झाला. कोर्टात केसही उभी राहिली त्यांनी आपला गुन्हा मान्य केले. त्यांची मालमत्ता विकून ठेवीदारांना व खातेदारांना पैसे मिळतील असं सांगितलं मात्र याबद्दल कार्यवाही अद्याप काहीही नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे आम्ही हा प्रश्न अधिवेशनात उपस्थित करत त्यावर चौकशी होऊन तत्काळ कारवाईची मागणी केली आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.
गुन्हे दाखल होऊनही ठेवीदारांच्या पैशांबाबत कुठलीही हालचाल दिसत नाही, म्हणून आम्ही ईडी कार्यलयात गेलो होतो. ठेवीदारांचे कष्टाचे पैसे परत मिळावे, हाच आमचा उद्देश आहे. ईडीने देखील चौकशी केली. मात्र सरकार घोटाळेबाजांवर गुन्हा सिद्ध होऊनही, काही कारवाई करत नाही. खातेदारांना पैसे मिळावे यासाठी प्रयत्न करत नाही. सर्वसामान्य खातेदारांच्या होणारे हाल आम्हाला पाहवत नाही. त्यामुळे आम्ही विधान भवनाच्या पायर्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी निदर्शन आंदोलन करत आहोत, असे महेश बालदी उरण येथील आमदारांनी सांगितले. तसेच पुढील काळात जर सरकारने कारवाई केली नाही तर खातेधारक आणि आणि स्थानिक आमदार तीव्र आंदोलन करू असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.