कॅनडात निघाली ‘तिरंगा – मॅपल कार रॅली’!
राष्ट्रवादी ‘इंडो - कॅनेडियन’ समुदायाचे फुटीरतावाद्यांना प्रत्युत्तर
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : भारताने कॅनडाला लाखो करोना लशी पुरविल्या आहेत, त्यासाठी भारताचे आभार मानण्यासाठी कॅनडामधील राष्ट्रवादी भारतीय समुदायाने रविवारी ‘तिरंगा पीस मॅपल कार रॅली’ आयोजित केली होती. त्यास मिळालेल्या प्रतिसाद पाहता कॅनडात राहून भारतात खलिस्तानी फुटीरतावादी कृत्यांना पाठिंबा देणाऱ्यांना योग्य तो संदेश मिळाला आहे.
भारत आणि कॅनडा या देशांचे परस्पर संबंध हा नेहमीच औत्सुक्याचा विषय असतो. कॅनडामध्ये बहुसंख्य भारतीय आणि भारतीय वंशाचे लोक वास्तव्यास आहेत, त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधात हा मुद्दा नेहमीच महत्वाचा ठरत असतो. अर्थात, कॅनडात राहून भारतात खलिस्तानी फुटीरतावादास खतपाणी घालणारेही काही लोक तेथे आहेत. त्यामुळेच कथित शेतकरी आंदोलनाविषयी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर काही दिवसातच पंतप्रधान ट्रुडो यांनी करोना लशीसंदर्भात भारताकडे विनंती केली होती. त्या मागणीस भारताने अतिशय सकारात्मक प्रतिसाद देऊन करोना लशीच्या लाखो मात्रा तातडीने कॅनडाकडे रवाना केल्या होत्या.
भारताच्या या भूमिकेचे कॅनडामधील राष्ट्रवादी भारतीय समुदायाने स्वागत केले आहे. दोन्ही देशातील संबंध अशाचप्रकारे मजबूत होत रहावेत यासाठी त्यांनी रविवारी ओंटारिओ येथील ब्रॉप्टनमध्ये ‘तिरंगा पीस मॅपल कार रॅली’चे आयोजन केले होते. रॅलीमध्ये सहभागी झालेल्यांनी म्हटले “भारताकडून वेळेत करोना लशींची मागणी केल्याबद्दल ट्रुडो सरकारचे आम्ही आभार मानतो. भारतानेही सरकारच्या विनंतीला प्रतिसाद देऊन ‘वसुधैव कुटुंबकम्’ या उक्तीप्रमाणे लशींच्या ५ लाख मात्र तातडीने पाठविल्या, त्याचप्रमाणे पुढील काही आठवड्यामध्ये आणखी २ दशलक्ष मात्रा कॅनडात दाखल होणार आहेत. भारताच्या या कृतीमुळे लाखो कॅनडावासियांचे प्राण वाचणार आहेत. त्यामुळे कॅनडाच्या विकासात मोठे योगदान देणाऱ्या इंडो कॅनेडियन समुदायासाठी आजचा दिवस हा अतिशय अभिमानाचा आहे”.
यावेळी राष्ट्रवादी इंडो – कॅनेडियन समुदायाने जगभरातील ४० देशांना लसपुरवठा करण्याच्या भारताच्या धोरणाचेही कौतुक केले. भारताच्या धोरणामुळे दोन्ही लोकशाही देशांमधील बंध अधिक मजबूत होणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.