कल्याण : कोरोनावर मात करण्यासाठी अवघ्या एका वर्षात त्यावरील लस तयार करण्यात आली. ही लस बाजारात सुध्दा आली आहे. मात्र ही लस टोचून घेण्याबाबत फ्रंटलाईन वर्कर्सच्या मनात अजूनही भिती आहे. त्यामुळेच लसीकरण मोहिमेला अल्प प्रतिसाद मिळत आहे.
कोरोनाची लस बनवण्यात भारतीय संशोधकांना यश आले आहे. भारतात लसीकरण मोहिमही हाती घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात तीस कोटी कोरोना वॉरियर्सना लस देण्याचे उद्दिष्ट्य आखण्यात आले. मात्र ही लस घेण्याबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मनातही भीती आणि संभ्रम आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन लसीकरण करण्यासाठी आवाहन करत आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत एकूण चाळीस टप्पे आत्तापर्यंत झाले आहेत. या टप्प्यात एकूण ३ हजार ६९९ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आजपासून फ्रंटलाईन वर्कसलाही लस देण्याची सुरूवात केली आहे. मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांचं सहकार्य कमी मिळत असल्याचे कल्याण डोंबिवली महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले. फ्रंटलाईन वर्कर्समध्ये लसीकरणाबाबत भिती असल्याने ते लस घेण्यास पुढाकार घेत नसल्याने आरोग्य कर्मचारी व डॉक्टर स्वत: लसीकरण करून जनजागृती करत आहे. त्याच बरोबर लस पूर्णतः सुरक्षित असून लसीकरणाला न घाबरत पुढे यावे आणि लसीकरण करून घ्यावे असे आवाहनही पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.