या अधिवेशनात कमी वेळात जनतेचे प्रश्न जोरकसपणे मांडून सरकारला उत्तर देण्यास बाध्य केले जाईल : देवेंद्र फडणवीस
मुंबई : नियम फक्त विरोधकांना, सत्ताधाऱ्यांना नाहीत का? कोरोनामुळे पूर्ण अधिवेशन घेता येत नसेल तर आता लेखानुदान घ्या आणि नंतर पूर्ण अधिवेशन घ्या अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत, कोरोनाच्या नावाखाली सरकार अधिवेशनासाठी तयार नाही. इथं कोरोना म्हणता आणि बाहेर तुमच्या मंत्र्यांचे सगळे कार्यक्रम सुरु आहे. तुमच्या मंत्र्यांना कुठलेच नियम नाहीत का? नियम फक्त विरोधी पक्षासाठी आहेत का? असा सवालही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना आज केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार अधिवेशनापासून म्हणजेच विरोधकांच्या आणि जनतेच्या प्रश्नापासून पळ काढत असल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. जे अधिवेशनात मांडायचे आहेत. त्यासाठी आम्ही पूर्ण अधिवेशन घेण्याची मागणी केल्याचं फडणवीसांनी सांगितलं. पण सरकार कायद्यात न बसणारं अधिवेशन घेतय त्यावर आमचा आक्षेप आहे असं माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. हा प्रकार म्हणजे पूर्णपणे अधिवेशनापासून पळ काढण्याचा प्रयत्न आहे. अधिवेशन टाळण्यासाठी कोरोनाचं नाटक सुरु असल्याचा दावा फडणवीसांनी केला.
‘स्वत:च्या आमदार, मंत्र्यांची सरकारला भीती’ विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न घेणं म्हणजे स्वत:च्या आमदारांना आणि मंत्र्यांना घाबरलं आहे. निवडणुकीत काही वेगळं चित्र निर्माण होईल का? अशी भीती सरकारला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकीचा विषयच अजेंड्यावर आणला गेला नाही, असल्याचा टोलाही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. सरकार अधिवेशनाचा कालावधी पहिला आठवडा, दुसऱ्या आठवड्यात बजेट आणि दोन दिवस चर्चा असा ठरल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे. त्यामुळे अधिवेशनात जेवढा कालावघधी मिळेल त्या कालावधीत सर्व जोरकसपणे सरकारला उघडू पाडू, असा इशारा फडणवीसांनी यावेळी सरकारला दिलाय.
उघडं पडण्याच्या भीतीनं सरकार पळ काढतंय’ संजय राठोड प्रकरण असो की वीज कापण्याचं असो, विरोधी पक्ष आक्रमक राहील, असा इशाराही फडणवीसांनी सरकारला दिला आहे. अशा प्रकरणात उघडं पडण्याच्या भीतीने सरकार अधिवेशनापासून पळ काढत असल्याची टीका त्यांनी केली आहे. जनतेच्या प्रश्नावर सरकारला काही देणंघेणं नाही. बिझनेस अॅडव्हायझरी कमिटीवरुन वॉकआऊट करत असल्याची माहिती फडणवीसांनी दिली.
सरकार विरोधकांच काहीही ऐकत नसल्याने आणि त्यांना कोणत्याही प्रकारच्या चर्चेत रस नसल्याने कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतून बहिर्गमन करण्याचाच तेवढा पर्याय आमच्याकडे उरला होता.महाराष्ट्र विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आज विधानभवन, मुंबई येथे झाली.या बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.