लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली अयोध्यानगरी !
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : श्रीरामजन्मभूमीत बुधवारी साजऱ्या झालेल्या पाचव्या दीपोत्सवामध्ये १२ लक्ष दिव्यांनी अयोध्योनगरी उजळून निघाली. यावेळी प्रज्लवित झालेल्या दिव्यांनी अयोध्येत पुन्हा एकदा त्रेतायुग अवतरल्याचा भास झाला. त्याचवेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी “पुन्हा एकदा कारसेवा झाल्यास गोळीबार नव्हे, तर राम आणि कृष्ण भक्तांवर पुष्पवृष्टी होईल” असे सांगून आगामी भविष्यकाळविषयी स्पष्ट संकेत दिला आहे.
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येमध्ये दिवाळीत दिपोत्सव साजरा करण्यास प्रारंभ केला. यंदाच्या वर्षी पाचवा दीपोत्सव साजरा करण्यात आला, यावेळी श्रीरामजन्मभूमीसह ३२ स्थानांवर १२ लक्ष दिव्यांची आरास करण्यात आली होती. यंदाच्या वर्षीच्या दीपोत्सवात प्रज्वलित करण्यात आलेल्या १२ लक्ष दिव्यांचा समावेश गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाला आहे. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी उपस्थित होते.
यावेळी संपुर्ण अयोध्यानगरी उत्सवरंगात रंगली होती. अयोध्येतील राम कथा उद्यानामध्ये भगवान श्रीराम, सीता आणि लक्ष्मण हे हेलिकॉप्टरमधून दाखल झाले, त्यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. अयोध्येमध्ये राम की पौडी येथे ९ लक्ष दिवे, श्रीराम जन्मभूमी परिसरात ५१ हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले. त्याचप्रमाणे अयोध्येची १४ कोसी परिक्रमा मार्गावरील सर्व पौराणिक स्थाने, कुंड, प्राचीन मंदिरे, मखौडा धाम येथे जवळपास ३ लक्ष दिव्यांची आरास करण्यात आली होती.
पुन्हा कारसेवा झाल्यास गोळीबार नव्हे, तर राम आणि कृष्ण भक्तांवर पुष्पवृष्टी होईल – योगी आदित्यनाथ
“अयोध्येत प्रज्वलित करण्यात आलेले दीप हे विकासाचे प्रतिक असून त्यांद्वारे सांस्कृतिक राष्ट्रवादाचा प्रकाश पसरत आहे”, असे उद्गार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दीपोत्सवात बोलताना काढले. ते पुढे म्हणाले, यापूर्वी दीपोत्सव साजरे केले त्यावेळी अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी कधी होणार, असा प्रश्न रामभक्तांनी विचारला होता. त्यावेळी आपण त्यांना धीर धरण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आपल्या सर्वांच्या निश्चयाचा विजय झाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ ऑगस्ट, २०२० रोजी श्रीराम मंदिराचे भूमीपुजन केले. ज्यावेळी श्रीराम मंदिराची उभारण पूर्ण होईल, त्यावेळी अयोध्ये जगातील एक प्रमुख धार्मिक नगरी म्हणून ओळखली जाईल, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला.
यापूर्वीच्या सरकारांचा पैसा कब्रस्तानांच्या भिंती आणि दरवाजे बनविण्यासाठी खर्च होत असल्याचा टोला योगी आदित्यनाथ यांनी लगाविला. ते म्हणाले, आज मंदिरांची पुनर्बांधणी आणि सौंदर्यीकरणासाठी राज्य सरकार पैसा खर्च करीत आहे. राज्यात ३१ वर्षांपूर्वी 'परिंदा भी पर नहीं मार सकता' अशी दर्पोक्ती करण्यात आली होती. त्यावेळची स्थिती रामभक्त आणि अयोध्यावासी कधीही विसरणार नाहीत. मात्र, “आता पुन्हा एकदा कारसेवा झाल्यास गोळीबार नव्हे, तर राम आणि कृष्ण भक्तांवर पुष्पवृष्टी होईल”; असे सांगून योगी आदित्यनाथ यांनी भविष्यकाळाविषयी आपले मनसुबेही स्पष्ट केले आहेत.